मुंबई : मराठा आरक्षण योद्धा आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक टोलेबाजी जोरात सुरू आहे. आज भुजबळांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांच्या विरोधात उपरोधिक टोले लगावले. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्या डोक्यातून अभिनव कल्पना पुढे येतात. त्यामुळे या कल्पनांचा आदर केला पाहिजे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या मागण्या कायद्याला धरून आहेत. त्यांना आता देवही रोखू शकत नाही. त्यामुळे जरांगेंना घाबरून वाटाघाटी न करता सरकारने ते म्हणतात त्याप्रमाणे थेट मराठा आरक्षणाचा जीआर काढावा, असा उपरोधिक टोला लगावला. एवढेच नव्हे, तर मंत्र्यांनी जरांगे पाटील यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी ये-जा करण्यापेक्षा अंतरवाली सराटीतच दोन-चार मंत्र्यांचे बंगले बांधावेत, असे म्हटले. यावेळी त्यांनी जरांगे यांनी सरकारला नव्हे, तर सरकारनेच जरांगे यांना वेठीस धरले असून, त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या पाहिजेत. जरांगे यांच्या मागण्यांना माझाही पाठिंबा आहे. त्यामुळे आपण आगामी मेळाव्यात जरांगे यांचे समर्थन करणार असल्याचा टोलाही भुजबळांनी लगावला.