रोह्यात महापुराची काळरात्र आली; नागरिक भयभीत, भिरा धरणातून पाणी सोडल्याने शहरावर संकट

भिरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने रोहा अष्टमी शहरासह नदीकाठच्या गावात मध्यरात्री पुराचे संकट कोसळले.
रोह्यात महापुराची काळरात्र आली; नागरिक भयभीत, भिरा धरणातून पाणी सोडल्याने शहरावर संकट
रोह्यात महापुराची काळरात्र आली; नागरिक भयभीत, भिरा धरणातून पाणी सोडल्याने शहरावर संकट
Published on

रोहा : भिरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने रोहा अष्टमी शहरासह नदीकाठच्या गावात मध्यरात्री पुराचे संकट कोसळले. सखल भागातील लोकांसाठी ही महापुराची काळरात्र ठरली असून रोहा-अष्टमीकरांनी संपूर्ण रात्र भयभीत वातावरणात जागून काढली.

नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी स्वतः माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, मुख्याधिकारी एडके, पालिकेचे कर्मचारी, नगरसेवकांनी रात्रभर धावपळ केली, नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी रात्रभर परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना धीर दिला, मदतकार्याचे नियोजन त्यांनी केले. पहाटेपर्यंत त्या नागरिकांच्या संपर्कात राहिल्या, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवकांच्या तत्परतेने मोठी जीवितहानी टळली आहे.

भिरा जलप्रकल्प परिसरात एका दिवसात २५०.२० मिमी पावसाची नोंद झाल्यानंतर भिरा पिकअप वेअरचे तीनही दरवाजे उघडून २०८.०७ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्यामुळे मध्यरात्री रोहा शहर व अष्टमी परिसरासह वरसे रोठखुर्द आदी नदीकाठच्या गावात महापुराचे संकट कोसळले. मुसळधार पाऊस, अंधार, वीजपुरवठा खंडित झाल्याने निर्माण झालेली भीती आणि वाढत्या पुराच्या पाण्यामुळे संपूर्ण रात्र रोह्यासाठी अक्षरशः काळरात्र ठरली.

सुरक्षिततेच्या कारणास्तव वीजपुरवठा बंद

वीजपेट्या व मीटरबॉक्स पाण्याखाली गेल्याने सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण रोहा शहराचा वीजपुरवठा बंद करण्यात आला.

मध्यरात्री राफ्टिंग बोटी आल्याने दिलासा

राफ्टिंग बोटी मागवून अष्टमी परिसरात अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यात आले. अन्सारी कुटुंबासह अनेकांना सुरक्षितपणे बाहेर काढून अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. बोटींची वाहतूक करण्यासाठी विशेष वाहनांचीही तातडीने व्यवस्था करण्यात आली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in