पक्ष ताब्यात घेण्याचा पटेल, तटकरेंचा प्रयत्न; आमदार रोहित पवार यांचा घणाघाती आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांनाअंधारात ठेवून निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करून पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी विधानभवनात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.
पक्ष ताब्यात घेण्याचा पटेल, तटकरेंचा प्रयत्न; आमदार रोहित पवार यांचा घणाघाती आरोप
Published on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांनाअंधारात ठेवून निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करून पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी विधानभवनात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.

अजितदादांच्या निधनानंतर १८ व्या दिवशी म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या सह्यांचे एक पत्र भारत निवडणूक आयोगाला देण्यात आले. त्यात अध्यक्षांच्या निधनामुळे कार्याध्यक्षांकडे म्हणजे प्रफुल पटेल यांच्याकडे पक्षाचे पूर्ण अधिकार असल्याचे कळवण्यात आले होते. सुनेत्रा पवारांना याची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी हे पत्र ग्राह्य धरू नये असे निवडणूक आयोगाला कळवल्याचा दावा रोहित पवार यांनी यावेळी केला.

इतकेच नव्हे तर अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू करण्याचा प्रयत्न झाला. दादा हयात असताना त्यांच्या घराबाहेर काळी जादू केली जाते. कदाचित नाशिकच्या भोंदूबाबाच्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर काळी जादू, पूजा करण्याचा प्रयत्न होता. त्यामागे पक्षावर नियंत्रण यावे असे काही होते का?असा सवालही रोहित पवार यांनी केला.

'त्या' पत्रामुळे काही नेत्यांवर अविश्वास असल्याची चर्चा

‘अजित पवार यांचे निधन झाले त्या दिवसापासून म्हणजे २८ जानेवारी २०२६ ते १० मार्च २०२६ पर्यंतच्या कालावधीत पक्षाच्या वतीने इतर कुणी निवडणूक आयोगाकडे केलेला पत्रव्यवहार अमान्य करावा’, असे पत्र राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. या पत्रामुळे पक्षातील काही नेत्यांवर त्यांनी अविश्वास दाखवला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळेच त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्यापर्यंतच्या कालावधीतील पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये’, असे सुनेत्रा पवार यांनी आयोगाला कळवल्याचे बोलले जाते.

सुनील तटकरेंचा पलटवार

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर काय-काय घडामोडी घडल्या तसेच सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांच्या विरोधात काय-काय कट कारस्थान रचले गेले याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आहे. ते सगळे आपल्याला बोलावे लागेल, असा इशारा तटकरे यांनी दिला. अजित पवार हयात असताना त्यांच्या विरोधात कट कारस्थान केले गेले. आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि आमच्या पक्षाच्या विरोधात तीच कट कारस्थाने सुरू आहेत, असा आरोप तटकरेंनी लगावला.

logo
marathi.freepressjournal.in