

जालना : जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडलेल्या अत्यंत भीषण अपघातात भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडले. जालन्यातील कडवंची शिवारात हा भीषण अपघात झाला असून, या अपघातात ६ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला. नागपूरहून मुंबईच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या ट्रकने महामार्गावर काम करत असलेल्या महिला मजुरांना जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की काही महिला मजूर ट्रकखाली चिरडल्या गेल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी हाहाकार माजला. अपघातानंतर जालना पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला. तसेच स्थानिक नागरिकांनीही मदतकार्य हाती घेतले आणि जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेवर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनीही प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, अपघाताचं नेमके कारण लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांपैकी कुणी रुग्णालयात पोहोचले तर कुणी अपघातस्थळी पोहोचले. तिथले दृश्य हृदय पिळवटणारे होते.
दोन वर्षांपूर्वीही घडला असाच अपघात
दरम्यान, २९ जून २०२४ रोजी देखील असाच एक भीषण अपघात याच समृद्धी महामार्गावर झाला होता. त्यातही सहा जण ठार तर तीन जण जखमी झाले होते. मृतांमध्ये तीन जण मुंबईमधील मालडचे तर अन्य तिघे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी होते.