अखेर मुहूर्त मिळाला! समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा ५ जूनपासून खुला

मुख्यमंत्री व महत्त्वाच्या नेत्यांच्या तारखा मिळत नसल्याने हे उद्घाटन लांबल्याचे अधिकारी खासगीत सांगतात. मात्र नुकतेच न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठलीही सबब न देता घेण्याचे निर्देश दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासनाने समृद्धीच्या ठाणे जिल्ह्यातील अखेरच्या टप्प्याचे उद्घाटन करण्याचे निश्चित केले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा ठाणे जिल्ह्यातील आमणे ते इगतपुरी हा ७६ किमीचा अखेरचा टप्पा ५ जूनला वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या टप्प्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे करण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्ग पूर्णत्वास येऊनही त्याच्या मुंबई दिशेने जाणाऱ्या अखेरच्या टप्प्याचे उद्घाटन रखडले होते. अखेरच्या टप्प्याचे यंदा १ मे या महाराष्ट्र दिनी उद्घाटन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात उद्घाटन होईल असे सांगितले जात होते. अखेर आता ५ जून रोजी उद्घाटनाचा नवा 'मुहूर्त' मिळाला आहे. या महामार्गावरील आवश्यक सर्व कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, मुख्यमंत्री व महत्त्वाच्या नेत्यांच्या तारखा मिळत नसल्याने हे उद्घाटन लांबल्याचे अधिकारी खासगीत सांगतात. मात्र नुकतेच न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठलीही सबब न देता घेण्याचे निर्देश दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासनाने समृद्धीच्या ठाणे जिल्ह्यातील अखेरच्या टप्प्याचे उद्घाटन करण्याचे निश्चित केले आहे. आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी हा महामार्ग सुरु करुन विरोधकांना शांत करण्याचा हा प्रयत्न असावा, असे देखील म्हटले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in