नागपूर : सध्याची राजकीय संस्कृती, पक्षांतर व निष्ठावंत कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी स्पष्ट भूमिका घेत सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या जोशी यांच्या निवृत्तीच्या घोषणेने भाजपसहित राजकीय वर्तुळाला धक्का बसला आहे. त्यांचे निवृत्तीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
१३ मे रोजी आमदारकीची मुदत पूर्ण झाल्यानंतर कोणतेही पद स्वीकारणार नाही. राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी, समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती. मात्र आज सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे. मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजही मी स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो, पण हे चित्र पाहता आता आपणच थांबावे, असा विचार मनात पक्का होत गेला आहे… आणि तोच निर्णय या पत्रातून मांडत आहे, असे ते म्हणालेत.
मी आता ५५ वर्षांचा झालो आहे. स्वतःची जागा रिक्त करणं आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या पुढील राजकीय वाटचालीला मी पूर्ण विचारांती पूर्णविराम देत आहे. पक्षाने मला मोठे केले याची मला जाणीव आहे. त्यामुळे या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागून मी आज हा निर्णय जाहीर करीत आहे. यापुढे मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्य जगेन आणि सर्वसामान्यांची सेवा आणि त्यांच्यासाठी कार्य करत राहीन, असे त्यांनी पत्रात नमूद केले.