साने गुरुजींचे भव्य स्मारक उभारू, अजित पवार यांची ग्वाही : ९७ व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

महाराष्ट्रात अध्यात्म, ज्ञान, तत्त्वज्ञान रुजविणारे अमळनेर हे महत्त्वाचे शहर आहे. प्रताप हायस्कूलमध्ये साने गुरुजींचे सहा वर्ष वास्तव्य होते.
साने गुरुजींचे भव्य स्मारक उभारू, अजित पवार यांची ग्वाही : ९७ व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

प्रतिनिधी/अमळनेर

महाराष्ट्रात अध्यात्म, ज्ञान, तत्त्वज्ञान रुजविणारे अमळनेर हे महत्त्वाचे शहर आहे. प्रताप हायस्कूलमध्ये साने गुरुजींचे सहा वर्ष वास्तव्य होते. साने गुरुजींच्या स्मारकाचा प्रस्ताव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तयार करावा. या प्रस्तावानुसार साने गुरुजींच्या स्मारकास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. साने गुरुजींचे नावाप्रमाणेच भव्य स्मारक झाले पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अमळनेर मराठी वाङ‌्मय मंडळाच्या वतीने आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे येथील प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी उद्घाटन झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे सपत्नीक उपस्थित होते. उद्घाटक म्हणून माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, समन्वयक नरेंद्र पाठक, साने गुरुजींच्या पुतणी सुधा साने यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, अमळनेरमध्ये सुरू झालेल्या अनेक गोष्टी जगात पोहचल्या आहेत. विप्रो कंपनी, तत्त्वज्ञान केंद्राचा जागतिक पातळीवर नावलौकिक आहे. बहिणाबाईंनी अतिशय सोप्या भाषेत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. राज्यात वाचनसंस्कृती वाढावी, यासाठी आम्ही शासन पातळीवर प्रयत्नशील आहोत. डिजिटल युगात वाचन संस्कृती बदलली आहे. वाचनसंस्कृती टिकून राहणे, ही समाजाची गरज आहे. मराठी साहित्य संमेलनास आता डिजिटल टच देण्यात आला आहे. सामाजिक सुधारणांच्या चळवळीत साहित्य, लेखक व कलाकारांचे अमूल्य योगदान आहे. राज्याच्या विकासासाठी साहित्यिकांनी व्यक्त झाले पाहिजे. त्यांच्या सूचनांचा निश्चितच स्वीकार केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, ‘‘मराठी भाषा वेगवेगळ्या राज्यात पोहचविण्याचे काम बृहन्महाराष्ट्र मंडळाने केले आहे. तालुका स्तरावर साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी २ लाख रुपये निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या वर्षापासून शाळेत वाचनाचा तास सक्तीचा केला आहे. साहित्य पारितोषिकात शासनाचा हस्तक्षेप नसावा, ही शासनाची भूमिका आहे. साहित्याची चळवळ रुजविण्याचे काम शासनाची चार मंडळं करत आहेत. मराठी धोरण यावर्षी जाहीर करणार आहोत. लवकरच मराठी भाषा धोरण जाहीर करणार आहोत.

संत साहित्य संमेलनास दरवर्षी २५ लाख देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सहा विभागांत पुस्तकाचे गाव केले जाणार आहे. मुंबईमध्ये शासनाच्या वतीने मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. वाई गावात मराठी विश्वकोष मंडळाची भव्य इमारत बांधण्यात येणार आहे. मराठी युवक मंडळांना पाच हजारांचे अनुदान दिले जाईल. मराठी भाषेच्या विकासासाठी साहित्यिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही केसरकर यांनी यावेळी दिली.

बहिणाबाईंनी खान्देशचे साहित्य समृद्ध केले -महाजन

संमेलनाच्या उद्घाटक सुमित्रा महाजन म्हणाल्या, ‘‘काळ्या मातीला हिरवा शालू नेसवून आपल्या कवितेच्या माध्यमातून सेवा केलेले कवी ना. धों. महानोर, जीवनाचे मर्म आपल्या अहिराणी रचनेच्या माध्यमातून मांडणाऱ्या बहिणाबाई चौधरी यासारख्यांनी खान्देशचे साहित्य समृद्ध केले आहे. राजकारणातील लोकांना साहित्याचा गंध नसतो, असे म्हणता येणार नाही. साहित्यातून समाजात वागावे कसे, याची शिकवणूक मिळते. तळागाळातील लोकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजकारण, समाजकारण केले जाते. पुस्तके जगाला जवळ आणण्याचे काम करतात, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in