राज्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांची मतमोजणी आज (२१ डिसेंबर) सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाली होती. या निकालांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकांमध्ये महायुतीतीलच काही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते, त्यामुळे या निकालांना राज्याच्या राजकारणात विशेष महत्त्व दिलं जात आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या निकालांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
"तेच मशीन, तीच सेटिंग आणि तोच पैसा"
ते म्हणाले की, "विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे आकडे होते, तेच आकडे पुन्हा इथेही दिसत आहेत. भाजप, अजित पवार गट आणि इतरांचे आकडे जसेच्या तसे आहेत," असा आरोप त्यांनी केला. “तेच मशीन, तीच सेटिंग आणि तोच पैसा वापरला गेला आहे. आकड्यांमध्ये जराही बदल दिसत नाही,” असं राऊत म्हणाले.
३० कोटींच्या बजेटच्या नगरपालिकेसाठी शंभर ते दीडशे कोटी रुपये केले खर्च
तसंच, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात पैसा वापरल्याचा आरोप करत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. “३० कोटींच्या बजेटच्या नगरपालिकेसाठी शंभर ते दीडशे कोटी रुपये खर्च केले जात आहेत. आतापर्यंत नगरपालिकांच्या निवडणुकीत चार्टर फ्लाइट आणि हेलिकॉप्टर वापरल्याचं कधी पाहिलं नव्हतं,” असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.