“मोदी विष्णूचे तेरावे अवतार काय? “, भाजपने शेअर केलेल्या ‘त्या’ पोस्टरवरुन राऊतांचा खोचक टोला

“मोदी विष्णूचे तेरावे अवतार काय? “, भाजपने शेअर केलेल्या ‘त्या’ पोस्टरवरुन राऊतांचा खोचक टोला

बाबरी मशिद पडल्यावर जे पार्श्वभागाला पाय लावून पळाले त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. बाबरी पडली त्यावेळी हे लोक काखा वर करुन जाबाबदारी टाळत होते, असेही राऊत म्हणाले.

भाजपकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका फोटोवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू रामाला अयोध्येला घेऊन जाताना दाखवले आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक टोला लगावला आहे. हे प्रभू रामाला अयोध्येला घेऊन जाणार, म्हणजे हे स्वत:ला कोण समजतात? मोदी म्हणजे विष्णूचे तेरावे अवतार काय? जे रामाला घेऊन अयोध्येला निघाले आहेत. हा भाजपचा निर्लज्जपणा आहे. हे कोट्यवधी राम भक्तांच्या भावना दुखावणारे पोस्टर असल्याचे संजय राऊत म्हणाले.

राऊत यांनी राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरुन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्ला चढवला. बाबरी मशिद पडल्यावर जे पार्श्वभागाला पाय लावून पळाले त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. बाबरी पडली त्यावेळी हे लोक काखा वर करुन जाबाबदारी टाळत होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी होय, बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असे उद्गार काढले होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असे राऊत यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आम्ही सर्वजण प्रभू रामचंद्राचे सामान्य भक्त आहोत. यामुळे या लढ्यात उतरलो होतो. अयोध्येसाठी लढाई सुरु असताना अनेक लोक ऐनवेळी काखा वर करुन बाजूला झाले, ‘आम्ही ते केले नाही’, असे म्हणू लागले. हे तेव्हाच स्पष्ट झाले होते की, हिंदुत्व मानणारे प्रभू रामचंद्रांचे व्हीआयपी आणि नकली भक्त कोण. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एकमेव होते ज्यांनी बाबरी पाडल्याची जबाबदारी स्वीकारली आणि जाहीरपणे सांगितले होय, बाबरी जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे.

बाबरीचे घुमट पडले तेव्हा कुठे गेल्या होत्या 56 इंच छात्या आणि मनगटं? तेव्हा छात्या आणि मनगटं पिचली होती. आता हे लोक आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. अयोध्या जाण्यासाठी आम्हाला निमंत्रणाची गरज नाही. आमची प्रभू रामचंद्रावर निष्ठा आहे. आम्ही केव्हाही अयोध्येला जाऊ, यापूर्वीही जात आलो आहोत. त्यामुळे भाजपसारख्या लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. आम्हाला माहिती आहे आमचे हिंदुत्व काय आहे, असा घणाघात त्यांनी केला.  

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in