"संजय राऊत विरोधात बोलतात म्हणून खून्नस....", ईडी चौकशीला जाताना संदीप राऊत यांचा आरोप

पूर्ण फॅमिलीवर दबाव टाकण्यासाठी हे करत आहेत. संजय राऊत यांनी सांगितले, घाबरू नका, माझा आदर्श ठेवा. मी साडेतीन महिने आत राहून आलो आहे, अजूनही वाघासारखा आहे, आणि...
"संजय राऊत विरोधात बोलतात म्हणून खून्नस....", ईडी चौकशीला जाताना संदीप राऊत यांचा आरोप

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशी लागली आहे. या चौकशीबाबत भाष्य करताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. "माझ्या खात्यावर राजीव साळुंखे यांच्याकडून पाच ते सहा लाख आले आहेत. त्यासंदर्भात चौकशी होणार आहे. कोरोना काळात लोकांना जेवण दिले गेले, त्याबाबतचे हे प्रकरण आहे. हे राजकीय हेतूने प्रेरित आहे. संजय राऊत विरोधात बोलतात. त्यांना नमवायचे आहे. सूड घ्यायचाय. ते खून्नस काढत आहेत", असा आरोप संदीप राऊत यांनी केला. आज ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी जात असताना त्यांनी हे वक्तव्य केले.

संजय राऊत यांना नमवण्यासाठी हे सगळे सुरु-

"संजय राऊत त्यांच्याविरोधात बोलतात. त्यांना कुठेतरी नमवायचे आहे. त्यामुळे हे सगळे सुरु आहे. माझ्या खात्यावर आलेले सहा लाख रुपये खूप मोठी रक्कम आहे. हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. काही ओळखीचे लोक होते, त्यांना किचन मिळत नव्हते ते माझ्याजवळ आले आणि किचन वापरायला मिळेल का? अशी विचारणा केली. मी त्यांना ते दिले", असे राऊत सांगितले.

"माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. ते पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहेत. त्यांना सूड घ्यायचा आहे. ते खून्नस काढत आहेत. पूर्ण फॅमिलीवर दबाव टाकण्यासाठी हे करत आहेत. संजय राऊत यांनी सांगितले, घाबरू नका, माझा आदर्श ठेवा. मी साडेतीन महिने आत राहून आलो आहे, अजूनही वाघासारखा आहे, आणि वाघासारखाच राहिल. मी काही केले नाही. राऊत यांनीही काही केले नाही तर मी का घाबरु?", असे राऊत यावेळी म्हणाले.

काय आहे प्रकरण?

मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचा 100 कोटींचा कोविड घोटाळा आता समोर आला आहे. गरिब स्थलांतरीत कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. भारत सरकारचेही त्याला समर्थन होते. या स्थलांतरीत कामगारांना खिचडी देण्याचे कॉन्ट्रॅक्ट 52 कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेने दिले होते. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असे मुंबई महानगरपालिकेचे म्हणणे आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचीच चौकशी सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in