‘बडी मुन्नी’ कोण हे धस यांनाच विचारा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला संताप

राष्ट्रवादीमध्ये नेमकी ‘बडी मुन्नी’ कोण आहे?, हा प्रश्न तुम्ही सुरेश धस यांनाच विचारा. या असल्या फालतू गोष्टी कोणी बोलत असेल, तर मी स्पष्ट नाव घेऊन बोलणार आहे.
अजित पवार, सुरेश धस (डावीकडून)
अजित पवार, सुरेश धस (डावीकडून)
Published on

पुणे : राष्ट्रवादीमध्ये नेमकी ‘बडी मुन्नी’ कोण आहे?, हा प्रश्न तुम्ही सुरेश धस यांनाच विचारा. या असल्या फालतू गोष्टी कोणी बोलत असेल, तर मी स्पष्ट नाव घेऊन बोलणार आहे. त्यामुळे त्यालाच विचारा कोण आहे, असा संताप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी व्यक्त केला. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. या प्रकरणात सुरेश धस हे धनंजय मुंडेंवर नवनवे आरोप करीत आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी, याप्रकरणी आरोपांपेक्षा तपास यंत्रणांना पुरावे द्या, कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे स्पष्ट केले.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातले वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दररोज सुरेश धस यांच्याकडून या प्रकरणात नवे आरोप करण्यात येत आहेत. सुरेश धस यांनी या प्रकरणावर बोलताना आता बडी मुन्नीचा उल्लेख केला आहे. मात्र ही बडी मुन्नी नेमकी कोण आहे हे अद्याप समोर आलेले नाही. याबाबत विचारले असता अजित पवार चांगलेच संतापले.

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत, मात्र, संतोष देशमुख हत्ये प्रकरणी एसआयटी नेमण्यात आली आहे. सीआयडी मार्फतही चौकशी सुरू आहे. तर न्यायालयीन चौकशी केली जात आहे. त्यामुळे तीन-तीन यंत्रणा यात चौकशी करत आहेत, असे अजित पवारांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी जर कोणी दोषी असेल आणि त्याच्यावरील गुन्हा सिद्ध झाला तर त्याला सोडले जाणार नाही अशी भूमीका मांडली आहे. आपणही या प्रकरणी फडणवीसांची भेट घेतली होती. या प्रकरणात पक्ष वगैरे पाहू नका. यात जर मोठ्या पदावर काम करणारी व्यक्ती जरी अडकली असेल तरी त्याच्यावर कारवाई करण्यात गय करू नका असे सांगितले आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिला आहे, असे पवार यांनी सांगितले.

या हत्येतील गुन्हेगार सापडायला वेळ लागला. मात्र या काळात कोण कोण फोनच्या माध्यमातून संपर्कात होते. त्यांच्यात काय संभाषण झालं? याची माहिती घेतली जात आहे. ती माहिती तपासातही पुढे येत आहे. सरकारनेही या संपूर्ण प्रकरणात गांभीर्याने लक्ष दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशा प्रकारच्या हत्या कधीच खपून घेतल्या जाणार नाहीत असेही अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. दरम्यान विरोधी पक्षातील नेते काही वक्तव्य करत आहेत. शिवाय सत्ताधारी पक्षातील नेतेही याबाबत बोलत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर ते त्यांनी तपास यंत्रणांकडे देणे गरजेचे आहे असे पवार म्हणाले.

आरोप करताना कोणावर अन्याय होवू नये याचीही आरोप करणाऱ्यांनी खबरदारी घेतली पाहीजे असेही ते म्हणाले. जो दोषी असेल त्याला पाठीशी घातले जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले. सुरेश धस आरोप करत आहेत. पण पुरावे नसतील तर आरोप करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न त्यांनी करत धनंजय मुंडे यांची एक प्रकार पाठराखण त्यांनी केली. आम्ही या प्रकरणाचे राजकारण करणार नाही. मी धस यांच्याबाबतीत बावनकुळे आणि मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे, असेही त्यांनी सांगितले. सरकार पोलिसांना इतक्या चांगल्या सुविधा देत असताना कायदा सुव्यव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण व्हावा? असेही पवार म्हणाले.

पगार वेळेत झाले पाहिजेत

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे पगार झाले नाहीत. त्यामागचे कारण विचारले असता, तेव्हा अजित पवारांनी तातडीने वरिष्ठ सचिव ओ. पी. गुप्ता यांना फोन लावण्यास सांगितले. त्यानंतर स्वीय सहाय्यकांनी ओ. पी. गुप्ता यांना फोन लावून तो अजित पवार यांच्याकडे दिला. तेव्हा अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत गुप्ता यांना आपल्या इथे शिक्षकांचे पगार झाले नाहीत? असा प्रश्न केला. त्यानंतर समोरून उत्तर ऐकल्यानंतर हो, आले लक्षात म्हणून फोन ठेवून दिला. अधिकाऱ्यांनी म्हटलं की, आपण पगाराचे पैसे विभागाला उपलब्ध करून दिले आहेत. ज्या त्या विभागात पगार देत असताना त्यांच्याकडे काही त्रुटी अंतर्गत समस्या असेल, त्यामुळे विलंब झाला असेल. अर्थ विभागाने सगळ्यांचे पैसे दिलेत. मी शिक्षण विभागाच्या सचिवांशीही बोलतो. पगार कुणाचे रखडणार नाहीत, असेही पवारांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in