
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंपीठाने याचिकाकर्त्याचा चांगलाच समाचार घेतला. याप्रकरणाशी आपला संबंध काय? याचिकेमागील नेमका हेतू काय? तपास करण्यासंबंधी आपण तज्ज्ञ आहात काय, असे प्रश्न् उपस्थित करताना याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. याचिका मागे घ्या अन्यथा दंड ठोठावला जाईल, अशी तंबी याचिकाकर्त्यांला दिली. अखेर याचिका मागे घेण्यात आली.
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तपासावर राजकिय नेत्यांचा दबाव असल्याचा आरोप करून तिरोडकर यांनी तपास हायकोर्टाच्या देखरेखीखाली करण्याची मागणी केली.
याचिकाकर्त्यांचा नेमका हेतू स्पष्ट होत नसल्याने याचिका सुनावणीस योग्य नाही असे स्पष्ट करत खंडपीठाने सुनावणीस नकार दिला. याचिका दाखल करायची असेल तर आधी तपास पूर्ण होऊ दे, आरोप पत्र दाखल झाल्यानंतर तुमचे काही मुद्दे असतील तर याचिका दाखल करा, असे खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, याचिकाकर्त्यांने याचिका मागे घेतली.