वाल्मिक कराडवर यापूर्वीच ईडी, पीएमएलएअंतर्गत कारवाई का नाही? सुप्रिया सुळेंनी थेट केंद्र सरकारलाच केले लक्ष्य

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहेत.
सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळेसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहेत. या हत्या प्रकरणात खंडणीच्या आरोपाखाली वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली. मात्र, याच कराडवर यापूर्वीच खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असतानाही त्याच्यावर ईडी आणि पीएमएलए कायद्यांतर्गत कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारला विचारला आहे.

वाल्मिक कराडवर आधीच खंडणीअंतर्गत गुन्हा दाखल होता. खंडणीविरोधात पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जातो. मग वाल्मिक कराडप्रकरणी ईडी आणि पीएमएलएची अंमलबजावणी का करण्यात आली नाही, खंडणीप्रकरणी कंपनीने मे महिन्यात नोटीस पाठवली होती. त्यामुळे वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल असतानाही ईडीने कारवाई का केली नाही, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला. सुप्रिया सुळे यांनी वाल्मिक कराडविरोधातील सर्व एफआयआरची प्रत माध्यम प्रतिनिधींना दाखवली.

या गुन्ह्यासंदर्भातील माहिती राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवली नव्हती का, त्यामुळे मी आणि खासदार बजरंग सोनावणे यासंदर्भात अर्थ मंत्रालयाला पत्र लिहिणार आहोत. महाराष्ट्रात गुंतवणूक येणार असेल आणि अशी खंडणी वसुली होणार असेल, तर महाराष्ट्रात गुंतवणूक कशी येणार? गुंतवणूकदारांनाही न्याय मिळणार नाही का? या प्रकरणात ईडी आणि पीएमएलएची कारवाई झाली नाही. वाल्मिक कराडला सातत्याने विशेष ट्रिटमेंट का दिली जाते? मे महिन्यात जो गुन्हा दाखल झाला त्याविरोधात कारवाई झाली असती तर संतोष देशमुखांची हत्याच झाली नसती, याचे उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावे लागेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘लाडकी बहीण योजना’ परळीचे वाल्मिक कराड आजही अध्यक्ष

“लाडकी बहीण योजनेचा परळी तालुक्यातील कमिटी अध्यक्ष आजही वाल्मिक कराड आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ही योजना आली. लोकसभेच्या आधीच वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा होता. ज्याच्यावर खंडणीचा गुन्हा त्याला लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष कसे करता? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. ईडी आणि पीएमएलएअंतर्गत कारवाई का झाली नाही? संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येला ३० दिवस झाले, यातील एक खुनी अद्याप फरार आहे. त्याला कधी अटक करणार? आणि खंडणीचा गुन्हा असलेल्या व्यक्तीला परळी तालुक्यातील लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष का केला, असे तीन सवाल सुळे यांनी यावेळी उपस्थित केले.

logo
marathi.freepressjournal.in