

रामभाऊ जगताप / कराड
मृत्यूनंतरही एका मृतदेहाच्या नशिबी अशी वेदनादायी विटंबना यावी, याच्याइतके दुर्दैव ते कोणते? याचाच प्रत्यय साताऱ्यातील पाटण तालुक्यातील ढोरोशी गावात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेने आला. एका ज्येष्ठ नागरिकाची पेटती चिता गावकऱ्यांच्या डोळ्यांदेखत ओढ्याच्या पुरात वाहून गेली.
या घटनेत अंत्यसंस्कार तर अपूर्ण राहिलेच. पण साधे ‘अस्थी विसर्जन’ करण्यासाठी राखही उरली नाही. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने ग्रामीण भागातील अपुऱ्या सुविधांचा आणि प्रशासकीय उदासीनतेचा अत्यंत क्रूर चेहरा समोर आणला आहे.
ढोरोशी (ता. पाटण) येथील ज्येष्ठ नागरिक कै. साहेबराव मारुती मुळीक यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ओढ्यालगत असलेल्या गावच्या तात्पुरत्या स्मशानभूमीत पार्थिव नेण्यात आले. नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत मुलाने वडिलांना मुखाग्नी दिला.
चितेने नुकताच पेट घेतला होता आणि अचानक निसर्गाने रौद्ररूप धारण केले. मुसळधार पावसामुळे शेजारच्या ओढ्याला क्षणार्धात महापूर आला. पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की, गावकऱ्यांच्या डोळ्यांदेखत पेटती चिता विझली आणि अर्धवट जळालेले पार्थिव लाकडांसह पुरात वाहून गेले. उपस्थित जनसमुदाय हताशपणे हा भयानक प्रसंग पाहत होता, पण पाण्याच्या वेगापुढे कोणाचेच काही चालले नाही.
‘आदर्श गावा’तील प्रकार
डोंगरकुशीत वसलेले ढोरोशी हे गाव ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात’ उल्लेखनीय कामगिरी करणारे गाव आहे. लोकसहभागातून विकास आणि पर्यटन स्थळ बनू पाहणारी आदर्श शाळा यामुळे या गावाने राज्यात नावलौकिक मिळवला. परंतु, अशा कौतुकास्पद गावात ‘पेटती चिता वाहून जाण्याची’ दुर्दैवी घटना घडली आहे. एका बाजूला डिजिटल आणि आदर्श गावाची स्वप्ने पाहायची आणि दुसऱ्या बाजूला अंत्यसंस्कारासाठी छप्पर नसणे, हा विरोधाभास तीव्र संताप व चीड निर्माण करणारा आहे.