
कराड : माण तालुक्यातील तेलदरा (भांडवली) येथील वृद्ध शेतकऱ्याचा उष्माघाताने शेतातील आंब्याच्या झाडाखालीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे शनिवारी उघडकीस आले. २१ एप्रिलपासून शिंदे बेपत्ता होते, या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून शनिवारी ते आंब्याच्या झाडाखाली मृत स्थितीत आढळले. याप्रकरणी डॉक्टरांना उष्माघातामुळे शिंदेंचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली. यामुळे उष्माघाताचा पहिला बळी साताऱ्यात झाल्याचे म्हटले जात आहे.
माण तालुक्यातील तेलदरा (भांडवली) येथील वृद्ध शेतकरी जोतीराम निवृत्ती शिंदे (७८) हे २१ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून घरातून गायब झाले होते.
गेले चार दिवस घरातील सर्वजण त्यांचा शोध घेत होते. यावेळी त्यांचा मुलगा योगेश वडिलांचा शोध घेत असतानाच त्यांच्याच मोगल दुती या शिवारात आंब्याच्या झाडाखाली जोतीराम शिंदे मृत अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. या घटनेचा तपास हवालदार आर. एस. गाढवे करत आहेत.
सध्या उष्णेतीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून दुपारी अति उष्णतेच्या कालावधीत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे अथवा उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती उपाययोजना कराव्यात, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.