एकनाथ शिंदेंसह शिवसेना आणि अपक्ष आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत मिळून राज्यात सरकार स्थापन केलं.एवढ्यावरच राजकीय संघर्ष थांबला नाही. तर यानंतर उद्धव ठाकरेंना शिंदेंनी अनेक धक्के दिले. आमदारांपाठोपाठ अनेक खासदार, नगरसेवक, पदाधिकारी अनेकांनी शिवसेना सोडली व शिंदेंना समर्थन दिलं. त्यानंतर शिवसेनेच्या झालेल्या अवस्थेवरुन राजकीय नेत्यांनी टोले लगावण्यास सुरुवात केली. त्यातच आता नितेश राणे केलेले ट्विट चर्चेत आहे. शिवसेना सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना जिवेमारण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. यापूर्वीही बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा नाकारल्याचा आरोप केला होता.
“जेव्हा माझ्या वडिलांनी एकनाथ शिंदेंप्रमाणे शिवसेना सोडली, तेव्हा त्यांनाही तथाकथित शांत आणि संयमी पक्षप्रमुखांनी ठार मारण्याचे आदेश दिले होते. नितेश राणे यांनी ट्विट केले की, "हे 'म्याव म्याव' संपू द्या मग आम्ही वस्रहरणाला सुरुवात करू.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देण्यास नकार दिल्याचा दावा बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. बंडखोर आमदारांनी लावलेले आरोप खरे नसून एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना सुरक्षा देऊ नये, असे कोणतेही आदेश दिले नव्हते, असे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.