
प्रतिनिधी/मुंबई
रिक्षा आणि टॅक्सी चालवून प्रतिदिनी हातावर पोट असलेल्या लोकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. रिक्षा, टॅक्सीचालकांच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या महामंडळाच्या अंतर्गत मिळणाऱ्या सोयीसुविधांची माहिती दिली.
सध्या मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचालकांना परिवहन विभागाकडून जो अतिरिक्त दंड आकारला जातो तो यापूढे आकारला जणार नाही, असे यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसे स्पष्ट निर्देश परिवहन विभागाच्या आयुक्त आणि पोलीस उपयुक्तांना दिले असल्याचे ते म्हणाले; मात्र त्यासोबतच नियम मोडला असेल तर मात्र हा दंड आकारला जाईल, असेही स्पष्ट केले. त्यासोबतच रिक्षा, टॅक्सीचालकांसाठी 'महाराष्ट्र टॅक्सी, ऑटोरिक्षा चालक-मालक कल्याणकारी महामंडळ' सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्रत्येक रिक्षा, टॅक्सीचालकाला जीवन विमा कवच
या महामंडळांतर्गत प्रत्येक रिक्षा, टॅक्सीचालकाला जीवन विमा कवच देण्यात येईल, तसेच त्याला तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी तरतूद करण्यात येणार आहे. अपघातात अचानक कुणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून ५० हजार देणार, ज्या रिक्षा किंवा टॅक्सीचालकांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येईल. त्यांच्या मुलांना कौशल्यविकास विभागाच्या माध्यमातून तंत्रकुशल केले जाईल.
६३ वर्षांवरील चालकांना ग्रॅज्युईटीसाठी तरतूद
यासोबतच शासनाचा जर्मन सरकारसोबत चार लाख तंत्रकुशल मनुष्यबळ पुरवण्याचा करार झाला असून, त्याअंतर्गत कुशल चालकांना परदेशी नोकरीसाठी जाण्याची संधी मिळेल. ६३ वर्षांवरील चालकांना ग्रॅज्युईटी मिळावी, यासाठी देखील तरतूद करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक चालकाला वर्षाला ३०० रुपये म्हणजे प्रतिमहिना २५ रुपये जमा करावे लागतील, तर त्यात उर्वरित भर शासनाकडून टाकण्यात येईल. त्यासाठी उद्योग, खनिकर्म आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी राज्याचे एमएसआरडीसी मंत्री दादाजी भुसे, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम आणि रिक्षा, टॅक्सीचालकांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.