हिंडेनबर्ग प्रकरणात संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) आवश्यकता नाही, अशी गुगली शरद पवार यांनी टाकल्यानंतर विरोधी पक्षांमध्ये गदारोळ माजला आहे. गौतम अदानी यांच्या मालकीच्या एनडीटीव्ही वाहिनीला शरद पवार यांनी शुक्रवारी मुलाखत दिली होती. यात पवार यांनी मांडलेली भूमिका विरोधकांना विशेषत: काँग्रेसला धक्का देणारी होती. पवारांच्या या भूमिकेमुळे अदानी घोटाळ्यावरून विरोधकांच्या एकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आपल्या भूमिकेवर वादळ उठल्यानंतर पवार यांनी मात्र स्वत:च शनिवारी पत्रकार बैठक घेत सारवासारव केली आणि विरोधकांचे ऐक्य मजबूत असल्याचा खुलासा केला, तर राहुल गांधी यांनीही ट्विट करत ‘प्रश्न एकच आहे, अदानी समूहातील बेनामी २० कोटींची गुंतवणूक कोणाची’ असा सवाल पुन्हा उपस्थित केला आहे. शिवाय काँग्रेस सोडून गेलेल्या गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, किरणकुमार रेड्डी, अनिल अँटोनी, हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर निशाणा साधला आहे.