आरक्षणावरून शरद पवारांचा पलटवार! चर्चा, आश्वासने तुमची, मग तोडग्यासाठी विरोधकांना बोलावण्यात शहाणपण ते कोणते?

अजित पवार यांना पुन्हा पक्षात घेण्याचा निर्णय आपण एकट्याने घेऊ शकत नसल्याचे सांगतानाच, भुजबळ हल्ली चांगले बोलतात, माझ्याविषयी आगपाखडही करतात, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

पुणे: मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काय आश्वासन दिले? जरांगे यांनी आपले उपोषण स्थगित का केले? ओबीसी समाजालाही शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी काय आश्वासन दिले, की ज्यामुळे त्यांनीही उपोषण मागे घेतले हे समजले पाहीजे. ते अजूनही समोर आलेले नाही. अशा स्थितीत चर्चा सरकार करणार, आश्वासन सरकार देणार मात्र तोडगा काढण्यासाठी विरोधकांना बोलवायचे हे शहाणपणाचे नव्हते आणि त्यामुळेच या बैठकीला गेलो नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पलटवार केला आहे.

लाडकी बहीण योजना लक्षात घेता, राज्याच्या आर्थिक परिस्थितीची आपल्याला काळजी वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. अजित पवार यांना पुन्हा पक्षात घेण्याचा निर्णय आपण एकट्याने घेऊ शकत नसल्याचे सांगतानाच, भुजबळ हल्ली चांगले बोलतात, माझ्याविषयी आगपाखडही करतात, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. शेकापचे जयंत पाटील यांच्या पराभवाला आमची चुकीची रणनीती कारणीभूत असल्याचे सांगतानाच, महायुतीमध्ये कोणताही संघर्ष नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आणि ओबीसी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठ फिरवली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. मराठा आरक्षणाचे शरद पवारांना काही पडलेले नाही अशी टीका करण्यात आली. ते फक्त राजकारण करत आहेत असा आरोपही करण्यात आला. त्यावर शरद पवारांनी पलटवार केला आहे. पुणे श्रमिक संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात पवार बोलत होते.

पवार म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषण केले. त्यावेळी त्यांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी सरकारमधले मंत्री गेले होते. शिवाय मुख्यमंत्रीही गेले. त्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतले. पुढे जरांगेंनी मुंबईच्या दिशेने कूच केले. त्यावेळीही मुख्यमंत्री जरांगेंना नवी मुंबईत भेटले. दोघांनी एकत्र येवून आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे मुख्यमंत्री, मंत्री यांनी जरांगें बरोबर काय चर्चा केली? त्यांना काय आश्वासने दिली? त्यातली किती पूर्ण झाली? याची माहिती सरकारने दिली नाही. दुसरीकडे ओबीसी नेत्यांबरोबरही सरकारमधील मंत्र्यांनी चर्चा केली. त्यांनीही त्यानंतर उपोषण मागे घेतले. त्यावेळी ओबीसी समाजाला सरकारने काय आश्वासन दिले होते हेही समोर आले पाहीजे. ते अजूनही समोर आले नाही. अशा स्थितीत चर्चा सरकार करणार, आश्वासन सरकार देणार मात्र तोडगा काढण्यासाठी विरोधकांना बोलवायचे हे शहाणपणाचे नव्हते. त्यामुळेच या बैठकीला गेलो नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील का पडले?

विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या पराभवाबाबत बोलताना पवार म्हणाले, जयंत पाटील यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये निर्णय झालेला नव्हता. माझ्याकडे १२ मते होती. शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा असे आम्हाला वाटत होते. कारण, लोकसभा निवडणूक आम्ही डाव्या पक्षांसोबत लढवली होती. त्यांनी काही जागा मागितल्या होत्या, पण तेव्हा आम्ही त्या जागा देण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यामुळे जयंत पाटलांना आम्ही पाठिंबा देण्याचे ठरवले होते.

आमची रणनीती चुकली!

संधी आली तर डाव्यांना प्राधान्य द्यावं असं मला वाटत होतं. काँग्रेसची मतं जास्त होती. शिवसेना ठाकरे गटाकडे पुरेशी मते नव्हती. पण, त्यांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. रणनीतीमध्ये मतभिन्नता होती. माझे व्यक्तिगत गणित वेगळे होते. निवडून येण्यासाठी २३ मते आवश्यक होती. माझे म्हणणे होते, काँग्रेसने त्यांच्या उमेदवाराला मते देऊन उरलेली मते ५० टक्के ठाकरे गटाला द्या आणि ५० टक्के मते जयंत पाटलांना द्या.

काँग्रेसकडे अधिकची मतं होती. आमच्याकडे बारा मते होती. ठाकरे गटाकडे आमच्यापेक्षा जास्त मते होती. काँग्रेसने पहिली मते त्यांच्या उमेदवाराला देणे साहजिकच होते. पण, उरलेली पहिली आणि दुसऱ्या पसंतीक्रमाची मते योग्यपणे दिली असती तर तिन्ही उमेदवार निवडून आले असते. पण, आमची रणनीती चुकली, आणि जयंत पाटील पराभूत झाले असं शरद पवार म्हणाले.

नेतृत्वावरून संघर्ष नाही

लोकसभा निवडणुकीत जास्त जागा घेऊन जास्त उमेदवार निवडून आणण्यात यश आलं नाही. विधानपरिषदेला सुद्धा उमेदवार दिला. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हट्ट करतात का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले की, थोडा स्वभाव असतो एखाद्याचा. कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता आपल्या पक्षाच्या हिताच्या दृष्टीने आग्रही भूमिका घेत असतात. थोडं अडजेस्ट करावं लागतं. लोकांसमोर सामूहिकपणे जात असताना तडजोड करायच्या असतात. मात्र, त्यामुळे आम्ही अस्वस्थ होत नाही. जयंत पाटलांना विधानपरिषदेत उमेदवारी दिली असताना उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला. त्यामुळे मविआमध्ये नेतृत्वावरून संघर्ष आहे का असे विचारण्यात आलं असता शरद पवारांनी तसे अजिबात नसल्याचे सांगितले.

भुजबळ- पवार भेट

पवार यांनी येऊन भेट घेऊन गेलेल्या छगन भुजबळांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, ते भेटायला आले त्यावेळी अंगात ताप होता. त्यामुळे सुट्टी घेतली होती. पण आपल्याला उठवण्यात आले. भुजबळ भेटण्यासाठी आले आहेत असे सांगण्यात आले. त्यांना विचारलं किती वेळ झाला. त्यावर एक तासापासून ते बसले आहेत असे सांगितले. शिवाय भेटल्या शिवाय जाणार नाही असेही ते म्हणत होते. त्यानंतर मी त्यांना भेटलो असे पवारांनी सांगितले. याभेटीत त्यांनी मध्यस्थी करण्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याचे पवारांनी सांगितले. पुढे भुजबळांची हल्लीची भाषणं फार छान झाली. ते बऱ्याच गोष्टी बोलले. बीड, बारामतीत चांगल्या प्रकारचे भाषण केली. माझ्याबद्दलही आगपाखड केली. हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

मला महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची काळजी

लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ.. हे यंदाच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आलं. पण, महाराष्ट्रात अजित पवार आणि जयंत पाटील यांना ६ ते ७ वेळा अर्थसंकल्प मांडायची संधी मिळाली. मात्र, या ६ ते ७ वेळेत बहीण भाऊ कुठेही आलेले दिसले नाहीत. बहीण भावांचा विचार होतो आहे याचा आनंद आहे. मात्र, हा सगळा चमत्कार लोकसभा निकालातील मतदारांच्या मतांचा आहे, असा टोला शरद पवार यांनी महायुती सरकारला टोला लगावला. मतदारांनी मतं व्यवस्थित दिली तर बहीण-भाऊ सर्वांची अडचण होते. मला एकच काळजी आहे, ती म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक स्थितीची असेही ते म्हणाले.

पवार म्हणाले, महाराष्ट्र हा देशातील २ ते ३ क्रमांकावरील राज्य होते, मात्र नियोजन मंडळाने काही दिवसांपूर्वी यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये, महाराष्ट्र ११ व्या क्रमांकाचे राज्य आहे, हे चिंता करण्याचे चित्र आहे. सध्या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे, अंदाजे ७ लाख ८० हजार कोटींचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. यावर्षीचं आत्ताचं कर्ज १ लाख १० हजार कोटींचं कर्ज हे वेगळं आहे, असे त्यांनी सांगितले.

अजितदादांचे डॅमेज कंट्रोल

शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील पक्ष संघटनेतील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी गुरुवारी तातडीची बैठक बोलविली आहे. अजितदादा ॲक्शन मोडवर आले असून उद्या नवीन शहराध्यक्ष निवडण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. पुण्यातील सर्किट हाऊस येथे सकाळी आठ वाजता ही बैठक होणार आहे. पक्ष संघटना टिकविण्यासाठी, पडझड रोखण्यासाठी माजी नगरसेवकांची बैठक बोलविली आहे. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, श्याम लांडे हे शहराध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत.

अजित पवारांना पुन्हा परत घेणार का?

अजित पवार पुन्हा परत येणार असतील तर त्यांना परत घेणार का? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणुका येतात आणि जातात. कुटुंब कायम राहतं. ते पुढे म्हणाले की, घरामध्ये सगळ्यांना जागा आहे. मात्र, पक्षांमध्ये जागा आहे की नाही हा व्यक्तिगत निर्णय मी घेणार नाही. माझे सगळे सहकारी संघर्षाच्या काळामध्ये मजबुतीने उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारेन आणि ते तयार झाले तर.. असे म्हणत त्यांनी हा निर्णय एकट्याचा होणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, अजित पवारांनी बारामतीमध्ये विकास केला, तरी बारामतीमध्ये लोकांनी तुम्हाला का निवडलं? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. यावर बोलताना शरद पवार यांनी मिश्किलपणे ‘अरे ती बारामती आहे... असे उत्तर दिले. पवारांनी असे म्हणताच एकच हशा पिकला. लोकांशी वैयक्तिक संबंध ठेवले पाहिजेत. याआधी मी फक्त शेवटची सभा घ्यायचो. मी ५० टक्के लोकांना नावाने ओळखायचो, पण आता जुनी लोकं नाहीत. मला खात्री होती की लोक सुप्रियाला निवडून देतील असे ते म्हणाले.

३० हून अधिक माजी नगरसेवकांचा शरदचंद्र पवार गटात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह तब्बल ३० हून अधिक माजी नगरसेवक, आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी राजीनामे सादर केले आणि तातडीने बुधवारी सकाळीच नवा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. पुण्यातील मोदी बागेत सकाळी साडे अकरा वाजता हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत आदी उपस्थित होते. पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये गव्हाणे यांच्यासह माजी महापौर हणमंतराव भोसले, वैशाली घोडेकर, माजी नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे, दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे पती रवी सोनवणे, दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांचे पुत्र यश साने, माजी नगरसेवक संजय नेवाळे, वसंत बोराटे, विनया तापकीर, माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले, माजी नगरसेवक समीर मासुळकर, गीता मंचरकर, संजय वाबळे, वैशाली उबाळे, शुभांगी बोराडे, अनुराधा गोफने, घनश्याम खेडेकर, तानाजी खाडे, शशिकिरण, विजया तापकीर, युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडून स्वागत करण्यात आले. पुरोगामी विचारांची कास धरून काम करणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत आहे. संघर्ष करून आपले विचार आपल्याला टिकवायचे आहेत. त्या दृष्टीने काम करा, असे मार्गदर्शन या वेळी शरद पवार यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in