सरकारकडून विरोधकांवर शहरी नक्षलींचा शिक्का - शरद पवार

राज्य शासनाकडून विरोधी विचारांच्या लोकांवर शहरी नक्षली असल्याचा शिक्का मारला जात आहे. याआधीही चांगले काम करणाऱ्या अनेकांना नक्षली ठरवून तुरुंगात टाकण्यात आले. मात्र, न्यायालयाने निकाल त्यांच्या बाजूने दिल्याचे दिसून येते. त्यामुळे यासंदर्भात जनमत तयार करावे लागेल, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केली.
सरकारकडून विरोधकांवर शहरी नक्षलींचा शिक्का - शरद पवार
Published on

पुणे : राज्य शासनाकडून विरोधी विचारांच्या लोकांवर शहरी नक्षली असल्याचा शिक्का मारला जात आहे. याआधीही चांगले काम करणाऱ्या अनेकांना नक्षली ठरवून तुरुंगात टाकण्यात आले. मात्र, न्यायालयाने निकाल त्यांच्या बाजूने दिल्याचे दिसून येते. त्यामुळे यासंदर्भात जनमत तयार करावे लागेल, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केली.

पालखी सोहळ्यात शहरी नक्षलवादी सहभागी होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी केला आहे. पवार यांनी ‘मोतीबाग’ या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी कायंदे यांच्या आरोपासंदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ‘पालखी सोहळ्य़ात शहरी नक्षलवादी सहभागी झाल्यासंदर्भात दोन संस्थांची नावे पुढे केली जात आहेत. त्यातील एक ‘लोकायत’ ही संस्था आहे. या संस्थेकडून अनेक चांगली कामे केली जात आहेत. ही संस्था नक्षली नाही. श्यामसुंदर सोन्नर हे अनेक वर्षांपासून चांगले काम करत आहेत. चांगले काम करणाऱ्या आणि विरोधी विचारांच्या लोकांवर शहरी नक्षलींचे शिक्के मारण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून होत आहे,' असे पवार यांनी सांगितले.

राज्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे या मार्गाची आवश्यकता आहे का, असे विचारले असता पवार म्हणाले, राज्यातील अनेक ठिकाणी जाण्यासाठी चांगले रस्ते आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चांगले रस्ते केले आहेत. या परिस्थितीत एक चांगला रस्ता असताना दुसरा रस्ता कशासाठी हा प्रश्न आहे. शक्तिपीठ महामार्गाची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. तर या रस्त्याची आवश्यकता का आहे, हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून समजून घेतले जाईल.

पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे विजयी मेळाव्यात सहभागी होणार नाही

हिंदी सक्तीबाबतचा आदेश रद्द केल्यानंतर शिवेसना (ठाकरे) आणि मनसेचा येत्या शनिवारी मुंबईतील वरळी येथे विजयी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होण्यासंदर्भातही शरद पवार यांनी भूमिका मांडली. याबाबत पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी भूमिका जाहीर केली आहे. हिंदी सक्तीविरोधातील आंदोलनाला पक्षाने पाठिंबा दिला होता. सहभागाविषयीची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्षांचा आदेश मी मानतो. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी या मेळाव्यात सहभागी होणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in