पक्ष मिळाला, चिन्हही मिळालं; अजितदादा गटाने निवडणूक आयोगात नेमका काय युक्तिवाद केला?

राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? यावर निवडणूक आयोगाकडे झालेल्या सुनावणीच्या वेळी अजित पवार गटाकडून शरद पवारांबाबत खळबळजनक आरोप करण्यात आले
पक्ष मिळाला, चिन्हही मिळालं; अजितदादा गटाने निवडणूक आयोगात नेमका काय युक्तिवाद केला?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? यावर निवडणूक आयोगाकडे झालेल्या सुनावणीच्या वेळी अजित पवार गटाकडून शरद पवारांबाबत खळबळजनक आरोप करण्यात आले होते. शरद पवार यांची निवड निवडणुकीच्या माध्यमातून झालेली नाही, एक व्यक्ती बेकायदेशीरपणे पक्ष चालवत आहेत. पक्ष घरच्यासारखा चालवला जात होता. जे निवडून आले नाही, ते नियुक्ती करत होते. त्यांची नियुक्ती वैध कशी म्हणता येईल? असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून केला गेला.

शरद पवार यांच्याविरुद्ध बंड झाल्यानंतर बहुसंख्य आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी यांनी अजित पवार यांचे नेतृत्व मान्य केले. त्यानंतर अजित पवार यांची निवड कायद्याला धरून करण्यात आली आहे. एकच व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही. प्रफुल पटेलांच्या सहीनं सगळ्या नियुक्त्या करण्यात आल्या, प्रफुल पटेल आमच्यासोबत आहेत. विधिमंडळातील बहुमत आमच्याबाजूने, त्याचा विचार करून निर्णय घेण्यात यावा, असा दावा अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात करण्यात आला.

नेत्यांची प्रतिज्ञापत्र आमच्याकडे आहेत राज्य आणि देशातील पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. सर्वात जास्त प्रतिज्ञापत्र आमच्याकडे आहेत. महाराष्ट्रातील ४२ आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. नागालँडच्या ७ आमदारांचाही आम्हाला पाठिंबा आहे, असं निवडणूक आयोगात सांगण्यात आलं.

अजित पवार गटाकडून शिवसेना प्रकरणाचा दाखलाही देण्यात आला. प्रत्येक कार्यकर्त्याची मोजणी शक्य नाही, पक्ष कुणाचा कार्यकर्ते आणि नेते ठरवतात, असा युक्तीवाद अजित पवार गटाकडून केला गेला. पक्षाच्या घटनेनुसार पक्षात काम चालत नाही, पक्ष घटना आणि निर्णय यात बरीच तफावत आहे, असा आरोपही अजित पवार गटाकडून केला गेला.

आम्ही योग्य पद्धतीने प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत, आमच्या कागदपत्रांमध्ये चूक नाही. ३० जूनला अजित पवारांनी निवडणूक आयोगाकडे पक्षाध्यक्षपदावर दावा करणारं पत्र दिलं. आयोगाने शरद पवारांना ४ वेळा संधी दिली, पण तरीही त्यांना वेळ हवा आहे.

logo
marathi.freepressjournal.in