आषाढी एकादशीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होत असतानाही मुख दर्शन सुरूच राहणार आहे. शासकीय महापूजेच्या चार तास आधी दर्शन रांग बंद असायची. यामुळे वारकऱ्यांची मोठी गैरसोय व्हायची, ही गैरसोय टाळण्यासाठी यंदा हा निर्णय घेण्यात आला आहे.
आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असतानाही मुखदर्शन सुरूच राहणार आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी रात्रीच्या बैठकीत दिली आहे. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पहाटे अडीच वाजता पूजेसाठी येतात आणि विठ्ठल रुक्मिणीची अधिकृत पूजा व सत्काराचा कार्यक्रम पहाटे ५ वाजेपर्यंत मंदिरात चालतो. यावेळी आषाढी एकादशीच्या इतिहासात प्रथमच अशी व्यवस्था केल्याने उत्सवादरम्यान सुमारे दीड ते दोन लाख भाविकांना देवाचे दर्शन होणार आहे. या दिवशी दर्शनासाठी भाविक ३०-३० तास रांगेत उभे असतात. त्याचवेळी राज्यभरातून आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते व्हीआयपी म्हणून दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे रांगेतील शेकडो भाविकांना या पवित्र दिवशी दर्शनाला मुकावे लागते. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्या सरकारने धाडसी निर्णय घेत आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असतानाही मुखदर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.