शिरवडे -तारगाव रेल्वे धावणार ताशी ९० कि.मी.

चाचण्यांदरम्यान जास्तीत जास्त १३१ किमी प्रति तास वेग गाठला गेला; मात्र सध्या त्यांनी या विभागात ताशी ९० किमी वेगाने गाड्या चालविण्यास मान्यता दिली
शिरवडे -तारगाव रेल्वे धावणार ताशी ९० कि.मी.

कराड : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील तारगाव-मसूर-शिरवडे या सुमारे १८ किमी लांबीच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाची पाहणी मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी केली असून, त्यांनी ताशी ९० किमी वेगाने गाड्या धावविण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर ही वेगमर्यादा हळूहळू ११० किमी प्रतितास करण्यात येणार आहे.

रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी गेल्या गुरू. २२ फेब्रु रोजी तारगाव-मसूर-शिरवडे खंडाच्या दुहेरीकरणाच्या कामाची पाहणी केली होती; मात्र याबाबतच्या मान्यतेचे पत्र आता रेल्वे प्रशासनाला प्राप्त झाल्याने या सुमारे १८ किमी लांबीच्या मार्गावरून प्रतीतास ९० किमी वेगमर्यादेला मंजुरी मिळाली आहे.यामध्ये तारगाव- मसूर आणि मसूर- शिरवडे असे दोन ब्लॉक सेक्शन आहेत. मनोज अरोरा यांनी सकाळी ९ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत इंस्पेक्शन ट्रॉलीने या सेक्शनची पाहणी केली आणि त्यानंतर शिरवडे ते तारगाव येथे वेगाची चाचणी घेतली.

चाचण्यांदरम्यान जास्तीत जास्त १३१ किमी प्रति तास वेग गाठला गेला; मात्र सध्या त्यांनी या विभागात ताशी ९० किमी वेगाने गाड्या चालविण्यास मान्यता दिली असून, ती हळूहळू ११० किमी प्रतितास करण्यात येणार आहे. या रेल्वे खंडातील तारगाव आणि मसूर येथे २ इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्यान्वित करण्यात आले आहेत.

या पाहणीदरम्यान सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) अवनीश पांडे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दू दुबे, मुख्य इंजीनियर (बांधकाम) सुरेश पाखरे यांच्यासह मुख्यालय व विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in