सांगलीची जागा शरद पवार-उद्धव ठाकरेंनी मिळून घेतली; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

महाविकास आघाडीत सांगली लोकसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटली आहे. त्यामुळे सांगलीतील काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. काँग्रेसचे येथील इच्छुक उमेदवार विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असताना त्यांचे बंधू आणि माजी खासदार प्रतीक पाटील यांनी बुधवारी अकोल्यात जाऊन आंबेडकर यांची भेट घेतली.
सांगलीची जागा शरद पवार-उद्धव ठाकरेंनी मिळून घेतली; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

प्रतिनिधी/मुंबई

सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे काहीच नव्हते. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपप्रणित महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मुंबईत राहणाऱ्या बिहार आणि दक्षिणेतील कार्यकर्ते ज्यांना भाजप जवळची वाटत होती, त्यांना आता असुरक्षित वाटू लागले असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महाविकास आघाडीत सांगली लोकसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटली आहे. त्यामुळे सांगलीतील काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. काँग्रेसचे येथील इच्छुक उमेदवार विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असताना त्यांचे बंधू आणि माजी खासदार प्रतीक पाटील यांनी बुधवारी अकोल्यात जाऊन आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीमुळे विशाल पाटील हे वंचितचे उमेदवार म्हणून किंवा वंचितच्या पाठिंब्याने सांगलीच्या आखाड्यात उतरू शकतात. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगलीचा निर्णय विशाल पाटील यांच्यावर सोपवला असल्याचे स्पष्ट केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. या निर्णयावर भाष्य करताना आंबेडकर यांनी यामुळे मुंबईत राहणाऱ्या बिहार आणि दक्षिणेतील कार्यकर्ते ज्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले असल्याचे सांगितले. मुंबईसारख्या शहरात मनसे किंवा शिवसेननेने दक्षिण आणि उत्तर भारतीयांच्या विरोधातले आंदोलन उभे केले होते. मनसेने धारावीत छटपूजेला विरोध केला होता तसेच आणि बिहारमधील लोकांना मारहाण केली होती, याची आठवण आंबेडकर यांनी करून दिली.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला पाहिजे तेवढा हुंडा मिळत नसल्याने ते महाविकास आघाडीत आले नाहीत, या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानाचा आंबेडकर यांनी यावेळी समाचार घेतला. “कालपर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नव्हते. त्यामुळे अशा लोकांनी हुंड्याची चर्चाच करू नये. आम्ही काढायला गेलो की, इतर जणांना सार्वजनिक फिरायला कठीण जाईल. माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका. आम्ही कपडे फाडण्यात एक्स्पर्ट आहोत,” असा इशारा आंबेडकर यांनी दिला.

वंचितचे मुंबईतील जागावाटप आज

मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत. कारण निवडणूक सुरू झाल्यानंतर भाजपवाले मनसेचा पाठिंबा घेतील. ते झाले की मुंबईतील गणित बदलणार असून त्यासाठी आम्ही थांबलो होतो. आता गुरुवारी संध्याकाळपर्यंत आम्ही मुंबईमधील उमेदवार जाहीर करू, असेही आंबेडकर म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in