शिवरायांचे किल्ले जागतिक वारसा यादीत! केंद्राकडून युनेस्कोकडे नामांकनासाठी १२ किल्ल्यांचा प्रस्ताव

महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी पाठविण्यात आला आहे.
शिवरायांचे किल्ले जागतिक वारसा यादीत! केंद्राकडून युनेस्कोकडे नामांकनासाठी १२ किल्ल्यांचा प्रस्ताव

मुंबई : हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गडकिल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. गेली अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गडकिल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी पाठविण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठविला आहे. भारत २०२४-२५ या वर्षासाठी 'मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया' अर्थात 'भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये' यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी नामांकन देणार आहे. या नामांकनामध्ये महाराष्ट्रातील साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला, अशा १२ किल्ल्यांचा समावेश आहे.

१७व्या आणि १९व्या शतकात विकसित झालेली 'भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये', त्या काळातील मराठा शासकांच्या कल्पनेतून साकारलेली अभेद्य तटबंदी आणि मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा भक्कम पुरावा आहेत. किल्ल्यांचे हे एकमेवाद्वितीय जाळे, त्यांच्या महत्त्वानुसार ठरवलेला त्यांचा क्रम, व्याप्ती आणि प्रतीकात्मक वैशिष्ट्यांमध्ये असलेले वैविध्य, सह्याद्रीच्या पर्वत रांगा, मनमोहक कोकण किनारा, दख्खनचे पठार आणि भारतीय द्वीपकल्पातील पूर्व घाट यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण भूदृश्य, भूप्रदेश आणि भौतिक वैशिष्ट्ये यांचा अनोखा मिलाफ आहे.

महाराष्ट्रात ३९०हून अधिक किल्ले

महाराष्ट्रात ३९०हून अधिक किल्ले आहेत. त्यापैकी फक्त बारा किल्ले मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडियासाठी निवडण्यात आले आहेत. यापैकी आठ भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित आहेत. यामध्ये शिवनेरी किल्ला, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजीचा किल्ला यांचा समावेश आहे, तर उर्वरित साल्हेर किल्ला, खांदेरी किल्ला, राजगड, प्रतापगड हे आधीपासूनच महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाने संरक्षित केले आहेत.

भारतात ४२ जागतिक वारसा स्थळे

भारतात सध्या ४२ जागतिक वारसा स्थळे आहेत. यापैकी ३४ सांस्कृतिक, सात नैसर्गिक आहेत आणि एक मिश्र प्रकारचे आहे. महाराष्ट्रात सहा जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यापैकी पाच सांस्कृतिक आणि एक नैसर्गिक स्थळ आहे. अजिंठा लेणी (१९८३), एलोरा लेणी (१९८३), एलिफंटा लेणी (१९८७), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) (२००४), व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स ऑफ मुंबई (२०१८) हे सांस्कृतिक श्रेणीत आणि महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळचा पश्चिम घाट (२०१२) यांचा समावेश नैसर्गिक श्रेणीमध्ये केला आहे. भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये ही २०२१ मधील जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील या स्थळांचा जागतिक वारसा यादीत समावेशासाठी नामांकित केलेली सहावी सांस्कृतिक संपदा आहे.

नामांकनासाठी पाठविलेल्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्रातील शिववारशांचा समावेश असून, या किल्ल्यांना आता जागतिक ओळख मिळू शकणार आहे. युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल.

-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in