
मुंबई : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात जमीन खचल्याने तेथील कामाच्या दर्जाबाबत विरोधकांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेत खचलेला जमिनीचा भाग समतोल केला आहे. मात्र, महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील भूभागाची तपासणी करण्यात येत आहे. याबाबतचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचल्याची घटना रविवारी घडली. या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला मोठे भगदाड पडले होते. त्यामुळे सरकारने कितीही दावा केला असला तरी चबुतऱ्याच्या आजूबाजूचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे समोर आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने केली दुरुस्ती
महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूला जमीन खचल्याने महायुती सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करत विरोधकांनी महायुतीला घेरले, तर दुसरीकडे या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टीमने घटनास्थळी धाव घेत तातडीने दुरुस्ती हाती घेत जमीन पुन्हा समतोल केली.
दरम्यान, याठिकाणी पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी चबुतऱ्याच्या आजुबाजूच्या भूभागाची तपासणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येथील भूभागाची तपासणी केल्यानंतर आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.