धुळ्यातील धक्कादायक घटना, एकाच कुटुंबातील चौघांनी संपवले आयुष्य

धुळे शहरातील समर्थ कॉलनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आई, वडील आणि दोन मुलांनी आत्महत्या केली असून, या भयंकर घटनेने जिल्हा हादरून गेला आहे
धुळ्यातील धक्कादायक घटना, एकाच कुटुंबातील चौघांनी संपवले आयुष्य
Published on

धुळे : धुळे शहरातील समर्थ कॉलनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आई, वडील आणि दोन मुलांनी आत्महत्या केली असून, या भयंकर घटनेने जिल्हा हादरून गेला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.

प्रवीण मानसिंग गिरासे (५३), गीता प्रवीण गिरासे (४७) तसेच मुले मितेश प्रवीण गिरासे (१८) आणि सोहम प्रवीण गिरासे (१५) अशी मृतांची नावे आहेत. धुळे शहरातील समर्थ कॉलनी परिसरात गिरासे कुटुंब राहत होते. मुलाच्या अ‍ॅडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी शेजाऱ्यांना सांगितले होते. मात्र त्यांनी अचानक आत्महत्या केल्याचे आढळून आले. यापैकी प्रवीण गिरासे यांनी गळफास घेऊन, तर कुटुंबातील इतर तिघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मृतदेहांजवळ कोणतीही सुसाइड नोट पोलिसांना सापडली नाही. मंगळवारपासून त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

प्रवीण गिरासे यांचे लामकानी गावात एक खताचे दुकान असून पत्नी गीता शिक्षिका आहे, तर मुलांचे शिक्षण सुरू होते. त्यांनी आपल्या शेजाऱ्यांना आपण मुलाच्या अ‍ॅडमिशनसाठी मुंबईला जाण्याचे कारण सांगितले होते. त्यानंतर मंगळवारपासूनच त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता. त्यांचे कुटुंबीय गुरुवारी त्यांना येथे भेटण्यासाठी आले असता, ही घटना उजेडात आली. त्यांनी तातडीने ही घटना पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.

logo
marathi.freepressjournal.in