
सांगली : मोबाईलचे स्क्रीन गार्ड कमी दरात देण्याच्या वादातून चौघा तरुणांनी मोबाईल दुकानातील एका कामगाराचा चाकू आणि कोयत्याने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
सांगली बस स्थानकाजवळ असलेल्या श्री भैरवनाथ मोबाईल शॉपीत ही घटना घडली असून विपुल अमृत पुरी गोस्वामी असे खून झालेल्या दुकानातील कामगाराचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी काही वेळातच आरोपींना अटक केली आहे.
मोबाईल दुकानात ग्राहक बनून आलेल्या हल्लेखोरांनी १०० रुपयांचे स्क्रीन गार्ड ५० रुपयांना मागितले होते. मात्र, दुकानातील कामगाराने ते ५० रुपयांत देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यातूनच तरुणांनी चाकू आणि कोयत्याने वार करत दुकानातील कामगाराचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर सांगली शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, त्यानंतर तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतले. मात्र, विनाकारण क्षुल्लक कारणावरुन झालेला वाद एका कुटुंबीयांवर मोठा दु:खाचा आघात देऊन गेला. घरातील कर्ता तरुण गेल्याने गोस्वामी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या खुनाच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधिक्षक रितू खोखर, उपविभागीय अधिकारी विमला एम, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.