
मुंबई : राज्यात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दिव्याग लाभार्थ्यांना दीड हजार रुपये अर्थसहाय्य मिळत होते, त्यात एक हजारांची वाढ करत आता अडीच हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. यासाठी ५७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे पाच दिव्यांगाना राज्य सरकारचा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, निराधार विधवा आदींना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य दिले जाते.
सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ४ लाख ५० हजार ७०० आणि श्रावणबाळ योजनेत २४ हजार ३ दिव्यांग लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना आता दरमहा अडीच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यास बुधवारी मान्यता देण्यात आली. हे अनुदान ऑक्टोबर २०२५ पासून देण्यात येणार आहे.