
मुंबई : तांत्रिक अडचणींमुळे बंद असलेल्या चिपी विमानतळाची सेवा पूर्ववत करण्यास मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाची सेवा काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे बंद आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करून हे विमानतळ व्हायबलिटी गॅप फंडिंग अंतर्गत सुरू करण्यासाठी केंद्राची परवानगी घेतली. यानुसार मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चिपी विमानतळाची सेवा पूर्ववत करण्यास सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.
चिपी विमानतळाची सेवा पूर्ववत झाल्यास कोकणातील, राज्यातील व राज्याबाहेरील पर्यटकांना याचा मोठा फायदा होईल. तसेच व्हायबलिटी गॅप फंडिंगमुळे चिपी विमानतळाची नाइट लँडिंगची समस्या देखील दूर होईल. यामुळे चिपी विमानतळाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल. गणेशोत्सवापूर्वी ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. हा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य मंत्रिमंडळाचे त्यांनी आभार व्यक्त केले.