
नागपूर : मध्य रेल्वे विभागाने नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या मार्गावर ‘स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने हा प्रस्ताव मान्य केल्यास नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई अशा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होतील.
सध्या नागपूर- सिकंदराबाद, नागपूर ते इंदूर आणि नागपूर - बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू आहेत. इंदूर आणि बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला उत्तम प्रतिसाद आहे. सिकंदराबाद एक्स्प्रेसला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या शहरादरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई दरम्यान ‘स्लीपर वंदे भारत’ सुरू करण्यात यावी, असा प्रस्ताव नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे. परंतु नवीन गाड्या सुरू करण्याचा निर्णय सर्वस्वी रेल्वेबोर्डाचा असतो, अशी माहिती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवनियुक्त विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी दिली.
कोरोना काळात भुसावळ-नागपूर-भुसावळ पॅसेंजर गाडी बंद करण्यात आली. ही लोकप्रिय गाडी असून ती पुन्हा सुरू करण्याची मागणी आहे. ही गाडी सुरू करण्याचा प्रस्तावदेखील रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे, असेही गर्ग म्हणाले.
नागपूर - सेवाग्राम तिसरा मार्ग डिसेंबरपर्यंत
नागपूर ते इटारसी, नागपूर ते सेवाग्राम आणि सेवाग्राम ते बल्लारपूर दरम्यान तिसरी आणि चौथ्या मार्गिकेचे काम सुरू आहे. नागपूर ते सेवाग्राम आणि सेवाग्राम ते माजरी (बल्लारपूर) तिसऱ्या मार्गिकेचे काम डिसेंबर २०२५ पूर्ण करण्यात येणार आहे. नागपूर ते इटारसी तिसरी मार्गिका २०२६ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर चौथ्या मार्गिकेचे काम सुरू होईल, असेही ते म्हणाले.