पुणे : शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. 'नमो विचार मंच' या नावाखाली शिवतारे हे बारामतीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. घराणेशाही आणि साम्राज्यवादाला न माणणाऱ्या सर्वसामान्यांना मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा. यासाठी मी बारामतीतून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिवतारेंनी आज सांगितले. यावेळी शिवतारेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.
अजित पवारांवर टीका करताना शिवतारे म्हणाले, "बारामती लोकसभा मतदारसंघ हा काय कोणाचा सातबारा नाही. बारामती हा देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघापैकी एक आहे. या मतदारसंघावर कोणाची मालकी नाही. यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे पवार, पवार करण्याऐवजी आपला स्वाभिमान जागृत करून लढले पाहिजे. विशेषत: अजित पवार यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या विरोधात मी प्रचार केला होता. पण, हा एक राजकारणाचा भाग आणि ते माझे कर्तव्य होते. यावेळी अजित पवारांनी खालची पातळी गाठली होती. तेव्हा मी २३ दिवस लीलावती रुग्णालयात दाखल होतो आणि डॉक्टरांनी बायपास सर्जरी करण्यास सांगितली होते. परंतु, स्टेन टाकल्या त्या देखील फेल झाल्या आणि मी संपूर्ण कार्डिअॅक रुग्णवाहिका घेऊन प्रचार करत होतो. त्यावेळी मरायला लागलाय तर कशाला निवडणूक लढवत आहे. खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी रुग्णवाहिकामधून प्रचार केला", अशी टीका अजित पवारांनी केल्याचे त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
"तू पुढे कास निवडून येतो, तेच मी बघतो. मी राज्यात कोणाला पाडायचे ठरवले तर मी कोणच्या बापाला ऐकत नाही आणि पाडतो म्हणजे पाडतोच, असे विधान देखील अजित पवार माझ्याबाबती केल्याचे शिवतारेंनी सांगितले. मी अजित पवारांना त्यांच्या उर्मट भाषेबद्दल माफ केले आहे, असे ते यावेळी स्पष्ट केले.
एका बाजूला लांडगा आणि दुसऱ्या बाजूला वाघ
शिवतारे म्हणाले, जेव्हा मी संपूर्ण बारामती फिरलो, त्यावेळी अजित पवारांच्या विरोधात जनता आहे. यावेळी लोक म्हणाले की, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आहेत. परंतु, अजित पवार हे उर्मट आहेत. त्यामुळे आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करणार आहोत, असे काही लोकांचे मत होते. काही लोक म्हणाले की, एका बाजूला लांडगा आणि दुसऱ्या बाजूला वाघ आहे. त्यामुळे कोणत्याही पिंजऱ्यात टाकले तरी तेच होणार आहे, अशी प्रतिक्रिया बारामतीतील लोकांच्या मनात असल्याचे शिवतारेंनी सांगितले. बारामतीत ६, ८०,००० मतदान हे पवारांच्या समर्थनार्थ आहे. पण, ५ लाख ८० हजार मतदान हे पवार विरोधक आहेत, अशी देखील माहिती शिवतारेंनी यावेळी दिली.
...म्हणून मी बारामतीतून लढणार
शिवतारे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनविले आहे. यात आपल्याला आपले सरकार निवडण्याचा अधिकार दिला आहे. त्या अधिकारांची अंमलबजावणी करायची असेल तर, आपल्या आवडीचा किंवा काम करणारा खासदार निवडायचा असेल तर, बारामतीतील लोकशाहीला माणणाऱ्या, घराणेशाही आणि साम्राज्यवादाला न माणणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून ही निवडणूक लढणार आहे, असे वक्तव्य शिवतारेंनी केले आहे.
पुण्याचे मालक असल्याची मानसिकता
"आम्हीच पुण्याचे मालक आहोत. फक्त बारामतीचे नाही तर, पुणे जिल्ह्याचे आम्हीच मालक आहोत, अशी अजित पवारांची माणसिकता आहे. ती मानसिकाता मोडली पाहिजे. हर्षवर्धन पाटील यांच्याकाडून लोकसभेत मतदान करून घ्यायचे. पण, विधानसभेत हर्षवर्धन यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे करायचे, अशा प्रकारची फसवेगिरी करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, अशा अविर्भावात ते राहतात. एखाद्यांने चूक केली तर त्यांना पश्यात्ताप तरी असतो पण, त्यांना पश्चात्तापही नाही. जणूकाही लोकाना फसवणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे ते वागत आहेत", अशी टीकाही त्यांनी केली.
बारामतीतील ३९ तालुक्याची पाण्यासाठी धडपड
शरद पवारांवर बोलताना शिवतारे म्हणाले, "शरद पवारांना ४१ वर्षापासून मतदान करत आहोत. पण, पवारांनी पुरंदरला कोणता एक प्रकल्प दिला तो दाखवावा. केंद्र, राज्याचे सर्व प्रकल्प, महिलांचे रुग्णालय, शेतीचे सर्व प्रकल्प, मोठ-मोठे कारखाने देखील बारातमीत आहेत. बारामती पश्चिममधील ३९ गावात आजही पिण्याचे पाणी नाही. एवढी वर्षे तुमच्या तालुक्यातील लोकांना पाणी देऊ शकला नाही. बारामती ही ब्रिटिश काळापासून बागाईत आहे. ते शरद पवारांनी केले नाही, असा खुलासाही शिवतारेंनी केला आहे.