
मुंबई : हवाई वाहतुकीला चालना देत राज्यातील विमानतळांचा विकास जलदगतीने व्हावा यासाठी राज्य सरकारने आणखी १०० कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. या निर्णयामुळे शिर्डी, रत्नागिरी, छत्रपती संभाजी नगर विमानतळांच्या कामाला गती मिळणार आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ४५५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय तरतूदीतून वित्त विभागाच्या मान्यतेने राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी ६८.२५ कोटींचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस २६ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या शासन ज्ञापनान्वये वितरीत केला आहे. उर्वरीत अर्थसंकल्पीय तरतूदीमधून राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी आणखी १०० कोटींचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरीत करण्यास मान्यता दिली आहे.