राष्ट्रवादी, शिवसेनेतील फूट घराणेशाहीमुळे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत फूट पडण्यास त्या-त्या पक्षांतील घराणेशाही जबाबदार आहे. सुप्रिया सुळेंमुळे राष्ट्रवादीत व आदित्य ठाकरेंमुळे शिवसेनेत फूट पडली,
राष्ट्रवादी, शिवसेनेतील फूट घराणेशाहीमुळे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत फूट पडण्यास त्या-त्या पक्षांतील घराणेशाही जबाबदार आहे. सुप्रिया सुळेंमुळे राष्ट्रवादीत व आदित्य ठाकरेंमुळे शिवसेनेत फूट पडली, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“काँग्रेस न होती तो क्या होता”, या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या मुलाखतीत त्यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर भाष्य केले. ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी अजित पवार यांना राजकीय वारसदार म्हणून पुढे आणले. त्यानंतर वरिष्ठांना वाटले की पुतण्याऐवजी मुलीकडे पक्ष जायला हवा. शिवसेनेत उद्धव ठाकरेंना वाटले की, पक्ष किंवा राजकारणात आदित्य ठाकरेंना पुढे आणले पाहिजे. त्याच अनुषंगाने त्यांनी राजकारणात वाटाघाटी सुरू केल्या. यासाठी त्यांनी आपल्या मूळ विचारधारेला तिलांजली देऊन दुसऱ्या विचारधारेला स्वीकारले. त्यामुळे त्यांच्या पक्षात फूट पडली.

देशात अनेक राजकीय पक्ष आहेत. या पक्षांनी काँग्रेसच्या राजकारणाची शैली स्वीकारली. काँग्रेसने घराणेशाही आणि पैशांच्या जोरावर राजकारण करण्याचा पायंडा पाडला. मात्र, भाजप हा एकमेव पक्ष होता, ज्याने काँग्रेसच्या विचारधारेला, त्यांच्या राजकारणाच्या शैलीला नाकारले आणि स्वतंत्र शैली विकसित केली. आज इतर राजकीय पक्षही हळूहळू स्वतःमध्ये बदल करत आहेत. भाजपच्या पावलांवर पाऊल टाकत इतर राजकीय पक्ष स्वतःमध्ये बदल करत आहेत.

भाजपने घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला असला तरी कुणालाही राजकारणात येण्यापासून रोखलेले नाही. जर राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढीला राजकारणात यायचे असेल तर त्यांनी जरूर यावे. पण स्वतःच्या ताकदीवर यावे. राजकारणाला स्वतःचा हक्क समजून येऊ नये. जे लोक योग्य आहेत, त्यांना डावलून जेव्हा फक्त आपल्या कुटुंबातील लोकांवरच लक्ष केंद्रित केले जाते, त्याला घराणेशाहीचे राजकारण म्हणतात. काँग्रेसमध्ये नेहरूंच्या घराण्यातील व्यक्तीकडेच नेता म्हणून पाहिले जाते. आज मल्लिकार्जुन खर्गे भलेही काँग्रेसचे अध्यक्ष असतील, पण त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. हे सर्वांना माहीत आहे, असे ते म्हणाले.

घराणेशाहीच्या राजकारणाचे कंबरडे मोडण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी सुरू केले. केवळ पुढाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आहे म्हणून यापुढे कुणीही राजकारणात दिसणार नाही. ज्याच्यात क्षमता आहे, तो स्वतःच्या हिमतीवर पुढे जाईल, अशाप्रकारच्या राजकारणाच्या दिशेने आम्ही चाललो आहोत, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in