शाळा गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी दिलासा देणार; शालेय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन; एसटी बस रद्द झाल्यास मिळणार तत्काळ मदत

एसटी बसमधून शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. एसटी प्रवासात काही अडचण आल्यास, एसटी बसेस वेळेवर न आल्यास अथवा अचानक रद्द झाल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी, यासाठी लवकरच एसटी महामंडळ हेल्पलाइन सुरू करणार आहे.
शाळा गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी दिलासा देणार; शालेय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन; एसटी बस रद्द झाल्यास मिळणार तत्काळ मदत
Published on

मुंबई : एसटी बसमधून शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. एसटी प्रवासात काही अडचण आल्यास, एसटी बसेस वेळेवर न आल्यास अथवा अचानक रद्द झाल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी, यासाठी लवकरच एसटी महामंडळ हेल्पलाइन सुरू करणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीला आगार व्यवस्थापक जबाबदार असणार आहेत.

राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून मानव विकास निधी अंतर्गत राजाच्या दुर्गम व आदिवासीबहुल भागामध्ये शालेय विद्यार्थिनींना प्रवासी सेवा देण्यासाठी मानव विकास बस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बस शालेय विद्यार्थिनींची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात याव्यात, अशा सूचना असतात. परंतु अनेक आगारात या नियमाची पायमल्ली होते. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली. यावेळी उपस्थित शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी याबाबत अनेक समस्या व तक्रारी मंत्र्यांकडे मांडल्या. अनेक शालेय बस वेळेवर न सुटणे, गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणे, बस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली. संध्याकाळी शाळा-महाविद्यालय सुटल्यानंतर किमान एक तासात मुले घरी जाणे अपेक्षित असते. मात्र बस वेळेवर न आल्याने अथवा अचानक रद्द झाल्याने मुलांना घरी पोहोचण्यास उशीर होतो. अनेक ठिकाणी गैरसमजातून पालकांनी विद्यार्थ्यांना उशिरा येण्याबद्दल शिक्षाही दिल्या आहेत. याबाबत स्थानिक एसटी प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सरनाईक यांनी केले.

शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना घरातून शाळेत जात असताना अथवा शाळेतून घरी येत असताना बस उशिरा सुटणे, त्या अचानक रद्द होणे, तांत्रिक बिघाडामुळे बस नादुरुस्त झाल्याने घरी पोहोचण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांनी एसटीच्या हेल्पलाइन क्रमांकवर संपर्क करून मदत घ्यावी, या - हेतूने एक हेल्पलाइन क्रमांक प्रदर्शित करण्यात येईल. ३१ विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक संबंधित शाळा, महाविद्यालयांना देण्यात येतील जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये महाविद्यालयाचे शाळा प्राचार्य, मुख्याध्यापक, थेट विद्यार्थी विद्यार्थ्यांनीदेखील विभाग नियंत्रकांना संपर्क करून आपल्या समस्या मांडू शकतात, अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीची जबाबदारी आगार व्यवस्थापकावर

एसटी बस उशिरा सुटणे, अचानक रद्द होणे अथवा अन्य कारणामुळे शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींचे तास चुकतात किंवा परीक्षेला ते वेळेवर पोहोचू शकत नाहीत. काही वेळेला त्यांची महत्त्वाची परीक्षादेखील बुडते. विद्यार्थ्यांच्या अशा शालेय नुकसानीला संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक व त्यांचे पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल. बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामूळे विद्यार्थ्यांचे जितक्या दिवसाचे शालेय नुकसान होईल, तितके दिवस यास जबाबदार असणारे पर्यवेक्षक अथवा अधिकाऱ्यांना निलंबित अथवा सक्तीचे रजेवर पाठवण्यात यावे, असे निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in