राज्य सरकारचं शिष्टमंडळ रिकाम्या हाती ; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

आम्हाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या. माझ्यावर दबाव आणू नका, असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
राज्य सरकारचं शिष्टमंडळ रिकाम्या हाती ; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

मनोज जरांगे यांची समजुत काढायला सरकारचं शिष्टमंडळाने आज अंतरवाली सराटी गावात भेट दिली. यावेळी राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन, मंत्री संदिपान भुमरे, मंत्री अतुल सावे, अर्जुन खोतकर, राजेश टोपे, इत्यादींनी जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मनोज जरांगे यांच्या अमरण उपोषणावर ठाम असल्याचं यावेळी दिसून आलं. आम्ही ओबीसीच आहोत हे आम्हाला समजत नाही. ओबीसी अंगावर येणार नाहीत. आम्हाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या. माझ्यावर दबाव आणू नका, असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांच्याकडे ३० दिवसांची मुदत मागितली. पण जरांगे यांनी सरकारला ४ दिवसांचा वेळ दिला आहे. माझी समाजासाठी मरायची तयारी आहे. तुम्हाल आणखी किती वेळ द्यायचा. जर आरक्षण मिळत नसेल तर मला असचं मरु द्या. एकतर आरक्षण मिळेत नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल. जगलो तर तुमचा आणि मेलो तर समाजाचा, अशा भाषेत जरांगे यांनी शिष्टमंडळाला उत्तर दिलं आहे.

आम्ही संयमाने घेत आहोत पण तुम्ही आमचे डोके फोडत आहात. मराठ्यांची पोरं आत्महत्या करत आहेत. आमचा अंत पाहु नका. तुम्हाला मी आणखी चार दिवसांचा अवधी देतो. भरती जवळ आली आहे. लाखांनी लोक आमची बाहेर आहेत. मी समाजाला शब्द दिला आहे. त्यामुळे अध्यादेश काढा तेव्हाचं मी उपोषण मागे गेईन, असं जरांगे म्हणाले.

आमची जात साठ वर्षे बाहेर ठेवली. ५० टक्क्यांची मर्यादा वाढवली आहे. पण आम्हाला आत घेतलं नाही. सरकारी फक्त इच्छाशक्ती हवी. अहवाल आला आहे तर पोरांचं कल्याण करा, असं आवाहन यावेळी जरांगे यांनी केलं.

logo
marathi.freepressjournal.in