
मुंबई : हिमाचल प्रदेश, राजस्थान, आसाम गुजरात, त्रिपुरा, छत्तीसगड आदी राज्यात केंद्र सरकारचा प्रदूषण नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
औद्योगिक प्रकल्पांनी पर्यावरणीय व सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. जे उद्योग घटक नियमांचे उल्लंघन करतील त्या उद्योग घटकांवर कारवाई केली जाईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सदस्य सना मलिक यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना सांगितले.
‘इज ऑफ बिझनेस डुईंग’ अंतर्गत केंद्र सरकारने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रदूषण नियंत्रणासाठी कायद्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक केले आहे. केंद्र सरकारच्या कायद्याची अंमलबजावणी राज्यात करण्यासाठी ठराव चालत नाही तर बिल सादर करावे लागते. त्यामुळे बिल आणण्याआधी विधी मंडळातील सदस्यांच्या सूचनांची नोंद घ्यावी, अशी मागणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली.