नागपूर : बीडमधील माजी सरपंचाची क्रूर हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ मंगळवारी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधान भवनात जोरदार निदर्शने केली आणि या हत्येतील आरोपींच्या त्वरित अटकेची मागणी केली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या सदस्यांनी निदर्शने करीत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे गेल्या आठवड्यात अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह केज तहसीलमधील दैठणा येथे सापडला होता. त्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा सीआयडी तपास करीत आहे. सरपंचाच्या हत्येत सत्तारूढ पक्षातील लोकांचा सहभाग असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.