खंडणीसाठी विद्यार्थिनीचा अपहरण करून खून; तिघा मित्रांना अटक

पुण्यातील नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉल परिसरातून ती बेपत्ता झाली. तिच्याशी संपर्क होत नसल्यामुळे तिच्या पालकांनी पुणे गाठले. त्यानंतर पोलिसांत तक्रार दिली होती. त्याचवेळी भाग्यश्रीच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर नऊ लाखांच्या खंडणीचा मेसेज आला. तुम्ही नऊ लाख रुपये द्या, अन्यथा मुलीला मारून टाकू, अशी धमकी त्या मेसेजमध्ये होती.
खंडणीसाठी विद्यार्थिनीचा अपहरण करून खून; तिघा मित्रांना अटक

पुणे (प्रतिनिधी) : शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या भाग्यश्री सूर्यकांत सुडे (२२) या विद्यार्थिनीचे तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी अपहरण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवम फुलावळे, सागर जाधव आणि सुरेश इंदोरे या तिच्या तीन मित्रांना अटक केली आहे. कर्जबाजारीपणातून आरोपींनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.

३० मार्चच्या रात्री आरोपींनी भाग्यश्रीचे अपहरण केले आणि खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून टाकला. मृत तरुणीचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे (वय ४९) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील भाग्यश्री सुडे ही पुण्यातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ‘बीई कॉम्प्युटर्स’ला असणारी भाग्यश्री ३० मार्च रोजी बेपत्ता झाली. पुण्यातील नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉल परिसरातून ती बेपत्ता झाली. तिच्याशी संपर्क होत नसल्यामुळे तिच्या पालकांनी पुणे गाठले. त्यानंतर पोलिसांत तक्रार दिली होती. त्याचवेळी भाग्यश्रीच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर नऊ लाखांच्या खंडणीचा मेसेज आला. तुम्ही नऊ लाख रुपये द्या, अन्यथा मुलीला मारून टाकू, अशी धमकी त्या मेसेजमध्ये होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपास करत एकाला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच संपूर्ण प्रकरण उघड झाले. पुण्यातील मॉलमधून बाहेर आल्यानंतर ती शिवम फुलवाळे, सागर जाधव आणि सुरेश इंदुरे या मित्रांसोबत गेली होती. शिवम हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. हे तिघे मराठवाड्यातील आहेत. जाधव आणि इंदुरे हे शिवमचे मित्र आहेत. त्यांनी भाग्यश्रीचा खून केल्याची कबुली दिली. ज्या दिवशी भाग्यश्रीचे अपहरण केले त्याच दिवशी तिचा खून केल्याचे त्यांनी सांगितले. सुपा गावच्या हद्दीत तिचा मृतदेह पुरल्याचे आरोपींनी सांगितले.

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार आर्थिक कर्जबाजारीपणातून आरोपींनी हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाग्यश्रीचे अपहरण केल्यास आपल्याला पैसे मिळू शकतात, असा आरोपींचा समज झाला आणि त्यातूनच त्यांनी ही कृत्य केले. तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in