![राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक; महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची निवड](http://media.assettype.com/freepressjournal-marathi%2F2024-07%2F2f25206f-ac78-48ad-b757-f8cbe89e9f13%2FWhatsApp_Image_2024_06_30_at_5_58_30_PM.avif?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
सुजाता सौनिक या १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी असून, यांनी याआधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे. त्यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ लाभणार असून, जून २०२५ मध्ये त्या सेवानिवृत्त होणार आहेत.
सेवाज्येष्ठतेनुसार, १९८७ च्या बॅचमधील गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (१९८८) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (१९८९) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात होते. त्यामध्ये सुजाता सौनिक यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
मुख्य सचिवपद भूषवणारे पहिले दाम्पत्य
विशेष म्हणजे सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे या पदावर काम करणारे ते पहिलेच दाम्पत्य ठरले आहे.