मुंबई: मी राज्य पातळीवरचा अध्यक्ष असून रायगडमध्ये जिल्हास्तरावर विशेष लक्ष देत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावरून शिंदे सेनेचे आमदार मंत्री भरत गोगावले यांना टोला लगावला.
मी आता राज्य पातळीवरचा अध्यक्ष आहे. रायगडमध्ये जिल्हास्तरावर विशेष लक्ष देत नाही. संपूर्ण राज्यात पालकमंत्रिपदी कोणा ना कोणावर जबाबदारी आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा वाद इतका काही महत्त्वाचा वाटत नाही. रायगड जिल्ह्यातील काही प्रश्न असेल तर महायुतीतील तिन्ही प्रमुख नेते योग्य तो निर्णय घेतील, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणूक असो वा विधानसभा निवडणुकीत सगळ्याच पक्षांनी मदत केली. आगामी निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढायची, अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. पुढेही चर्चा होईल आणि महायुतीतील तिन्ही नेते योग्य तो निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
..तर वावगे काय !
राज्यात महायुतीची सत्ता असून भाजपच्या सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे ओबीसी व मराठा समाजासाठी नेमलेल्या उपसमितीवर भाजपचे नेते असतील तर त्यात वावगे नाही. मंत्रिमंडळाच्या उपसमित्या असून त्या राज्य सरकारच्या अखत्यारितील आहेत. त्यामुळे त्याबाबत मी जास्त बोलणे योग्य नाही, असे तटकरे म्हणाले.