सुप्रीम कोर्टाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला

बीडमधील बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस नकार दिला.
सुप्रीम कोर्टाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला
Published on

मुंबई : बीडमधील बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस नकार दिला. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्यासमोर गुरुवारी या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यापूर्वी १९ फेब्रुवारीला या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी पार पडली होती. आजच्या निर्णयामुळे कराडला तातडीचा दिलासा मिळाला नाही. मात्र, खटल्याची सुनावणी पुढे सरकत नसेल तर वर्षभरानंतर पुन्हा जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्याची त्याला संधी राहणार आहे. याआधी औरंगाबाद खंडपीठ तसेच बीड जिल्हा न्यायालयानेही वाल्मिक कराड याचे जामीन अर्ज आणि दोषमुक्तीचे अर्ज फेटाळले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील हा निर्णय त्याच्यासाठी आणखी एक मोठा अडथळा ठरला आहे. आजच्या सुनावणीपूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कॅव्हेट दाखल करून आपली बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी केली होती. दीड वर्षांपासून आमचे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्याबाबतही नवी माहिती समोर आली आहे. तो आतापर्यंत तीन वेळा आपल्या गावी येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. ही माहिती त्यांनी सीआयडीला दिल्याचे सांगितले. कृष्णा आंधळे मोबाईलचा वापर करत नसल्यामुळे त्याचा माग काढणे कठीण जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. कुटुंबाला या आरोपीपासून धोका असल्याची भीती व्यक्त करत त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in