

पुणे : जीएसटीसारख्या महत्त्वाच्या बिलांसाठी काँग्रेसने नेहमीच सहकार्य केले आहे, मग आता सत्ता टिकवण्यासाठी पक्ष आणि घरे फोडण्याची काय गरज आहे? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ आणि खासदारांच्या पक्षांतरावरून उपस्थित केला. देशामधून लोकशाही संपुष्टात येते की काय, अशी भीती वाटते असेही त्या म्हणाल्या. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील प्रश्न उपस्थित केला.
महाराष्ट्रात सध्या कायद्याचे राज्य नसून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही. राज्यात केवळ जाहिरातबाजी आणि पक्ष फोडण्याचे काम सुरू असून सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी टीकाही सुळे यांनी केली.
मविआतील समन्वयाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीचे काम अतिशय संघटितपणे सुरू असून रोज सकाळी धोरण ठरवले जाते. राज्यातील आमदारांच्या गैरहजेरीबाबत त्यांनी स्पष्ट केले की, अनेक आमदार पूर्वपरवानगी घेऊन वैयक्तिक कामांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत.
मध्य प्रदेशातील भ्रष्टाचार आणि अयोध्येतील राम मंदिरासाठी जमा केलेल्या चांदीच्या विटांचा हिशोब या मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. अयोध्येपासून उज्जैनपर्यंतच्या श्रद्धास्थानांमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर ते सहन केले जाणार नाही आणि हा प्रश्न संसदेत मांडला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये झालेला खून या घटनांचा उल्लेख करत सुळे म्हणल्या की, पोलिसांच्या वर्दीचा धाक आता कुणालाही राहिलेला नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील मंथरवाडी येथे झालेला गोळीबार ही चिंतेची बाब असून पुण्यात खरोखरच गुन्हेगारी कमी झाली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबई आणि पुण्याची झालेली दुरवस्था पाहता, मान्सूनपूर्व कामे अद्याप प्रलंबित असल्याचे स्पष्ट होते. विरोध असताना आमच्यावर टीका करणारे आज सत्तेत असताना केवळ जाहिरातबाजीत मग्न आहेत आणि नियोजनाचा पूर्णपणे अभाव दिसून येत आहे, असेही त्या म्हणाल्या.
निधी अपलोड करण्याची पद्धत क्लिष्ट
खासदारांच्या निधी वापराबाबत बोलताना त्यांनी प्रशासकीय त्रुटींकडे लक्ष वेधले. डॅशबोर्डवर माहिती अपलोड करण्याची नवीन पद्धत क्लिष्ट असल्याने निधी वापराचे चुकीचे चित्र दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. या संदर्भात त्या स्वतः पुणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.