औरंगाबाद : बाजारात टोमॅटोची वाढलेली मागणी आणि गगनाला भिडलेले दर यामुळे टोमॅटोची शेती आता लक्षावधी रुपये मूल्याची झाली आहेत. परिणामी चिंतातूर झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या टोमॅटोचे संरक्षण आणि देखरेख करण्यासाठी चक्क सीसीटीव्ही तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. बाजारात सध्या टोमॅटोला १५० ते २०० रुपये दरम्यान दर आहे.
औरंगाबादपासून २० किमी अंतरावर असलेल्या शाहपूर बंजर या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आपल्या टोमॅटो शेताची देखभाल करण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर सुरू केला आहे. तेथील शेतकरी शरद रावते म्हणाले की, आता आम्हाला टोमॅटो गमावणे परवडणारे नाही. सध्या बाजारात त्यांना प्रचंड मागणी असून, २२ ते २५ किलो टोमॅटोला ३ हजार रुपये भाव मिळत आहे. माझे शेत पाच एकरचे आहे. त्यातील दीड एकर क्षेत्रावर मी टोमॅटो लावले आहेत. त्यातून मला ६ ते ७ लाख रुपये सहज मिळून जातील. दहा दिवसांपूर्वी गंगापूर येथील शेतातून २० ते २५ किलो टोमॅटो चोरीला गेले होते. यामुळे माझे शेत वाचवण्यासाठी मी २२ हजार रुपये मोजून सीसीटीव्ही लावून घेतले आहे. हे कॅमेरे सौरऊर्जेवर चालतात. यामुळे त्यासाठी वीजपुरवठ्याची चिंता करावी लागत नाही. मी माझ्या शेतात काय चालले आहे ते कोणत्याही ठिकाणाहून माझ्या फोनमध्ये पाहू शकत आहे.