पुणे : नाशिक येथील महिला अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे घनिष्ठ कौटुंबिक व आर्थिक संबंध असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. रुपाली चाकणकर यांनी स्वतः अघोरी विद्या आणि तंत्र-मंत्राचा वापर केल्याचा दावा पीडित महिलेच्या हवाल्याने करत अंधारे यांनी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी चाकणकर यांची नार्को टेस्ट करावी आणि त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी येथे केली.
सुषमा अंधारे यांनी पुराव्यादाखल काही फोटो सादर करत चाकणकर यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली. २ सप्टेंबर २०२४ रोजी असलेल्या सोमवती अमावस्येच्या दिवशी रुपाली चाकणकर यांनी स्वतःच्या हाताची अनामिका (बोट) कापून तंत्र-मंत्र विधी केला होता, असा दावा अंधारे यांनी केला. तंत्र-मंत्र शास्त्रात अनामिका बोटाला सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित मानले जाते आणि वशीकरण किंवा यश प्राप्तीसाठी या बोटाचा वापर मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी केला जातो, असे अंधारे यांनी स्पष्ट केले.
सप्टेंबर ते जानेवारी २०२४ या दरम्यान चाकणकर यांच्या बोटाला बँडेज असल्याचे अनेक फोटो समोर आले असून, हे सर्व अघोरी कृत्यांचेच पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले.
अंधारे म्हणाल्या की, खरातच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा किंवा त्याच्या मुलीचे लग्न ठरले तेव्हा चाकणकर आघाडीवर होत्या. खरातची भाची सध्या चाकणकर यांच्याच घरी राहते, असेही त्यांनी नमूद केले. खरात आणि चाकणकर यांच्यातील आर्थिक हितसंबंधांची कागदपत्रे येत्या दोन दिवसांत जाहीर करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. खरातचे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या पत्रकारावर गुन्हे दाखल करण्यासाठी चाकणकर यांनी दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला.
अध्यक्षांसारख्या काळी जादू आणि अघोरी विद्या हे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन असून, महिला आयोगाच्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने असे कृत्य करणे अत्यंत गंभीर असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी चाकणकर आणि खरात यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी केली आहे.