मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र - कनार्टक सीमावर्ती भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनूसार एसटी महामंडळाने आपल्या कर्नाटकात जाणाऱ्या दैनंदिन ११५६ फेऱ्यांपैकी ३८२ फेऱ्या पुढील सूचना येईपर्यत अंशत: रद्द ठेवल्या. दोन दिवसानंतर वातावरण काहीसे शमल्याने स्थानिक पोलिसांच्या सूचनेनुसार बेळगावमार्गे धावणाऱ्या कोल्हापूर ते निपाणी एसटी वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
महाराष्ट्राच्या विविध विभागातून सुटणाऱ्या एसटी बसेस नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिधुंदुर्ग या जिल्हयातून कर्नाटक राज्यात जातात. यापैकी कोल्हापूरातून निपाणी-बेळगाव मार्गे जाणाऱ्या सुमारे ५७२ फेऱ्यांपैकी ३१२ फेऱ्या स्थानिक जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या सुचनेनुसार दोन दिवसांपूर्वी रद्द करण्यात आल्या. तथापि गडहिंगलज, चंदगड, आजरा, तळ कोकण व गोव्याला जाणाऱ्या बसफेऱ्या निपाणी ऐवजी अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या. तणावाचे वातावरण असल्याने या बसेस रद्द करण्यात आल्या. मात्र सद्यस्थितीत महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद यामुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण काहीसे शमल्याने वाहतुकीत होणारी अडचण टाळण्यासाठी स्थानिक पोलिसांनी एसटी वाहतूक सुरु करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार बेळगावमार्गे धावणाऱ्या कोल्हापूर ते निपाणी एसटी वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून वाहतूक सुरु करण्यात आली आहे.