

मुंबई : निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेची अंतिम मुदत ८ ऑगस्ट रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे बीएलओ कामासाठी नियुक्त शिक्षकांना ८ ऑगस्टनंतर या कामातून मुक्त करण्यासाठी शिक्षक संघटना पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. शिक्षकांना अध्यापन कामासाठी शाळेत उपस्थित राहण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिक्षक महासंघाकडून करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे शिक्षकांचे मुख्य कार्य आहे. यानंतरही बीएलओ किंवा एसआयआरची कामे शिक्षकांना देण्यात आली आहेत. निवडणूक कामे शिक्षकांना देण्यास संघटनांनी विरोध केला होता. यानंतरही शिक्षकांना निवडणूक कामे देण्यात आली आहेत. मात्र एसआयआर मोहीमेची अंतिम मुदत ८ ऑगस्ट रोजी संपुष्टात येत आहे. राज्यातील अनेक शाळांमधील शिक्षक सध्या बीएलओ म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे शाळांतील अध्यापन आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम पूर्णतेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि शाळांमधील नियमित अध्यापन सुरळीत ठेवण्यासाठी ८ ऑगस्टनंतर शिक्षकांना बीएलओच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासंदर्भातील आदेश तातडीने जारी करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक महासंघाने केली आहे. यासंदर्भात शिक्षक महासंघाने शालेय शिक्षण विभागाला निवेदन दिले आहे. शिक्षकांना ‘एसआयआर’च्या कामाला जुंपल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची टीका होत आहे.