

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांचा एक स्वतंत्र गट तयार करून नंतर हाच गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करण्याबाबत आवश्यक ती सर्व प्रक्रिया बुधवारी पार पाडण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. काही तांत्रिक गोष्टी अद्याप बाकी असल्याने तसेच विलिनीकरणाची प्रक्रिया कायद्याच्या कचाट्यात अडकू नये, यासाठी विलिनीकरणाचा अधिकृत निर्णय या आठवड्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येणार असल्याचे कळते.
उद्धव ठाकरे यांच्या खासदारांसोबत गेले काही महिने शिंदे यांची गोपनीय चर्चा सुरू होती. पक्षांतरबंदी कायद्याखाली कारवाई होऊ नये यासाठी ६ खासदारांचा गट तयार करण्याबाबत घडामोडी सुरू होत्या. या खासदारांच्या बैठकीबाबत माध्यमांमध्ये बातम्या पसरल्याने या प्रक्रियेका काहीशी खीळ बसाली होती. मात्र गेल्या महिन्याच्या शेवटी पुन्हा बैठकांना सुरूवात झाली होती. त्यानुसार या सहा बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचे पत्र मंगळवारीच लोकसभा अध्यक्षांना दिले होते. स्वतंत्र गट म्हणून त्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजूरी दिली असून हा गट शिवसेनेमध्ये विलिनीकरण करण्याबाबतही आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. यासर्व प्रक्रियेमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. लोकसभा अध्यक्षांसोबतचा सर्व संवाद त्यांनी पार पाडल्याचे सांगण्यात आले.
येत्या दोन दिवसात या विलिनीकरणाची अधिकृत घोषणा करण्यात येणार होती. मात्र काही तांत्रिक बाबी अद्याप शिल्ल्क आहेत. शिवाय काही कायदेशीर पेचप्रसंग उद्भभवू नये तसेच याआधी ठाकरे यांचे आमदार फुटल्याची प्रक्रिया जशी न्यायालयीन वादात अडकली तसे काही पुन्हा होऊ नये यासाठीच हा निर्णय थोडा विलंबाने होणार असल्याचे कळते.
वास्तविक शिवसेनेच्या वर्धापनदिनी अर्थात १९ जून या खासदारांची विलिनीकरणाची प्रक्रिया जाहीर करण्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू होती. मात्र अजून काही तांत्रिक गोष्टी शिल्लक असल्याने आता ही घोषणा १९ जून रोजी होण्याची शक्यता धूसर बनली आहे. त्याऐवजी विलिनीकरणाची अधिकृत घोषणा २१ जून नंतर कधीही केली जाणार असल्याचे समजते.
दरम्यान या घडामोडींचा कोणालाही सुगावा लागू नये यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. शिंदे स्वत मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. यातील आवश्यक त्या बाबी पार पाडल्यानंतर लगेचच बुधवारी दुपारी ते मुंबईत परतले.
संजय जाधव यांना मंत्रिपद?
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या खासदारांच्या या गटाने याआधीच्या बैठकीत केंद्रात मंत्रिपद देण्याची मागणी केली होती. त्यानुसार एक राज्यमंत्रिपद देण्यात येणार असून मंत्रिपदाची माळ फुटीर गटाचे नेतृत्व करणारे मराठवाड्यातील खासदार संजय जाधव यांच्या गळ्यात पडणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
ठाकरे गटातर्फे व्हीप जारी
खासदार अरविंद सावंत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत बोलताना सावंत म्हणाले की, संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठी मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. आतापर्यंत आमच्या पक्षातील एकाही खासदाराने किंवा नेत्याने पक्ष सोडत असल्याचे आम्हाला सांगितलेले नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या खासदारांच्या फुटीच्या चर्चांवर सावंत यांनी थेट भाष्य करत, पक्षातील कुणीही अधिकृतपणे जाण्याची भूमिका मांडलेली नसल्याचे स्पष्ट केले. पक्षाने या सर्व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन तातडीने सर्व खासदारांसाठी अधिकृत व्हीप जारी केला असून, दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पक्षाच्या वतीने अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. खासदार अरविंद सावंत यांनीही याला दुजोरा दिला असून, संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिल्याची माहिती त्यांनी दिली.