
मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत विविध प्रकल्प अजूनही रखडलेलेच असल्याची कबुली मंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. हे प्रकल्प पुढील निधीसाठी अपात्र मानले गेले, असेही ते म्हणाले.
शिवसेना (ठाकरे गट) आमदार सचिन अहिर यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात देसाई यांनी सांगितले की, काही सार्वजनिक-खाजगी भागीदारी गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारच्या योगदानाचा भाग म्हणून ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वितरित करण्यात आला होता. ते प्रकल्प पुढील निधीसाठी अपात्र मानले गेले. त्यांना पीएमएवाय अंतर्गत निधी वाटप करण्यात आले होते, असे ते म्हणाले. बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम सुरू होण्यापूर्वीच पीएमएवाय अंतर्गत पैसे मिळाले. त्यापैकी काहींनी रक्कम परत केली. तर काहींनी लाभार्थ्यांना त्यांच्या इतर प्रकल्पांमध्ये समायोजित करण्याचे आश्वासन दिले, असे देसाई म्हणाले.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) एक अहवाल तयार केला आहे. तो सध्या गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या पुनरावलोकनाखाली आहे, असेही त्यांनी सांगितले.