शासन आपल्या दारी अन् खर्चही सर्वसामान्यांच्या माथ्यावरी ; जयंत पाटील यांची जोरदार टीका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोजक्या शब्दात सरकारवर जोरदार टीका केली.
शासन आपल्या दारी अन् खर्चही सर्वसामान्यांच्या माथ्यावरी ; जयंत पाटील यांची जोरदार टीका

मुंबई : येत्या काही दिवसात महाराष्ट्र शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम बीड जिल्ह्यातील परळी येथे होऊ घातलेला आहे. मात्र शासनाच्या या कार्यक्रमावर केल्या जाणाऱ्या वारेमाप खर्चावरून ‘शासन आपल्या दारी... खर्चदेखील सर्वसामान्यांच्या माथ्यावरी...’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोजक्या शब्दात सरकारवर जोरदार टीका केली.

परळी येथील नियोजित कार्यक्रमाच्या मंडपासाठी जवळपास २ कोटी २१ लाख ९० हजार ८५० रुपयांची निविदा मागवण्यात आली आहे. मुख्य मंडपासाठी ८१ लाख ९४ हजार १०० रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे. साईड मंडपासाठी ६० लाख १४ हजार १४० रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे. तर इलेक्ट्रिक कामांसाठी ७९ लाख ८२ हजार ५१० रुपयांची निविदा मागवण्यात आली आहे. सरकार पैशांची उधळपट्टी करत असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा संताप व्यक्त केला आहे.

१७ ऑगस्ट रोजी परळी येथे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेला देखील भव्यदिव्य मंडप उभारण्यात आला होता. आता ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठीदेखील तोडीसतोड मंडप उभारण्याचे नियोजन आहे. मात्र हा खर्च करदात्यांच्या खिशातून केला जाणार आहे.

संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च २ कोटी २१ लाख ९० हजार ८५०
मुख्य मंडपासाठी निविदा ८१ लाख ९४ हजार १०० रुपये
साईड मंडपासाठी निविदा ६० लाख १४ हजार १४० रुपये
इलेक्ट्रिक कामासाठी निविदा ७९ लाख ८२ हजार ५१० रुपये

logo
marathi.freepressjournal.in